नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्रालयाने श्रीलंकेतील तामिळी दहशतवाद्यांच्या एलटीटीई या संघटनेवरील बंदी आणखी पाच वर्षांसाठी वाढवली आहे. त्या विषयीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. या संघटनेच्या दहशतवादी आणि विघातक कारवाया सुरूच असून त्यांच्या कारवायांमुळे देशाच्या एकतेला आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाल्यामुळे ही बंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे गृहमंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या संघटनेचा श्रीलंकेच्या लष्कराने काही वर्षांपुर्वीच खात्मा केला असला तरी त्या संघटनेचे अजूनही काही समर्थक तामिळनाडुत कार्यरत असल्याने त्यांच्या कारवायांची दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांच्यावरील बंदीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही संघटना भारत विरोधी असल्याची टिपण्णीही गृहमंत्रालयाने केली आहे.