माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला एकटे राहणे शक्यच नाही. आपले विचार, मतं स्पष्ट करायला, बोलायला कुणीतरी हवे असते. संवाद साधायला कुणीतरी हवे असते.
विचारविनिमय महत्वाचे आहे. दूर असलेल्या व्यक्तिशी संवाद साधण्यासाठी, त्या व्यक्तिची खुशाली कळण्यासाठी एक मार्ग होता तो म्हणजे पत्र. आपल्या मनातील भावना, खुशाली, आनंद लोक पत्र लिहून व्यक्त करत होते. ते पत्र पोस्टमन इकडून तिकडे पोहचवण्याचे काम करायचा. दोन व्यक्तींच्या भावना पोहचवणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे “पोस्टमन’.
पूर्वी संवाद साधण्याचे मार्ग उपलब्ध नव्हते. डाकसेवा सुरु झाल्यामुळे लोकं लिहू लागली, पत्र पाठवू लागली, एकमेकांशी संवाद साधू लागली. पोस्टमन गावात आला की, लोकांना खुप आनंद व्हायचा. कारण तो आपल्या प्रिय व्यक्तिचा संदेश आपल्यापर्यंत पोहचवतो. पोस्टमनला लोक देवदूतच समजायचे. एक – एक पत्राचे उत्तर येण्यास बरेच दिवस लागायचे. पण लोक धिराने घ्यायची, पत्राची वाट पहायची. एक कागद व एक पेन याच्या सहाय्याने कागदावर मनातल्या भावना सहज लिहिल्या जायच्या.त्या पत्रातील शब्दांमध्ये माया, प्रेम ओथंबलेले असायचे. पत्र वाचणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद काही औरच असायचा.
हळूहळू तंत्रज्ञानात प्रगती झाली. टेलिफोनचा शोध लागला, मग मोबाईल आला. सध्या ‘स्मार्टफोन’ जास्त चर्चेत आहेत. सोशल मिडियावर अनेक माध्यम आहेत, ज्यादवारे लोक एकमेकांशी संवाद साधतात. व्हाट्सएप, फेसबुक इ. ऍप्सद्वारे लोक एकमेकांशी बोलतात.कीबोर्डवर टाइप केले की, मोबाइल स्क्रीनवर आपोआप शब्द उमटतात.व मेसेज पाठवला जातो. त्यामुळे हातांच्या बोटांना टकटक टाइप करण्याची सवय लागते. मग कोण लिहितेय पत्र आजकाल? लिहिण्याचा आळस बाकी काही नाही. “टाइप करा आणि सेंड करा.’ हाच आजचा मूलमंत्र आहे. पानभर पत्र लिहायला कुणाकड़े वेळ आहे का? लोकं आजकाल भावनाही व्हाट्सअपवरील इमोजीद्वारे व्यक्त करतात. एक संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्वरित पाठवता येतो. त्यांमुळे वेळेची बचत होते. आता बरेच बदल झाले आहेत. पत्रांची जागा आता मेसेजने घेतली. पण मायेचा ओलावा मेसेजमध्ये दिसतो का? सोशल मिडियामुळे कुणी पत्रच लिहीत नाहीत. त्यामुळे ‘पोस्टमन काका’ पत्र घेऊन येत नाहीत.
सध्या कुरियर सेवा उपलब्ध आहेत. पण कुरियरद्वारे लोकं डॉक्युमेंट, वस्तु,सामान पाठवतात. पत्र नाही पाठवत. जग बदलत आहे. प्रगतीच्या दिशेने भरधाव जाताना आपण संवेदनशून्य होत आहोत. लहानपणी आपण सगळ्यांनी हा खेळ खेळला असेल, “मामाचं पत्र हरवलं, ते मला सापडलं”. खरंच मामाचं ते पत्र हरवलय. ते सापडतच नाही.
प्रिय….. अशी पत्राची सुरुवात वाचल्यावर किती आनंद होतो.. आता लोकं प्रिय ऐवजी डिअर लिहायला लागली. पत्राचे कवर गुलाबी असल्यास लोकांना कळायचं, हे प्रेमपत्र आहे… त्या गुलाबी पत्राची मजाच वेगळी. दुराव्यातही जवळ असण्याचा आभास निर्माण करायची ही पत्रे. ज्यांना मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करता येत नाहीत, ते सुद्धा पत्रांचा आधार घेतात. पूर्वीच्या प्रेमात ‘पत्र’ हा महत्वाचा घटक असायचा. आता व्हाट्सऍप मेसेज अग्रस्थानी आहे. त्यामुळे पत्र लिहून व्यक्त व्हा. आणि भावना व्यक्त करण्याचा आनंद घ्या. तुम्ही लिहिलेले पत्र वाचून तुमच्या प्रिय व्यक्तीच्या चेहऱ्यावर येणाऱ्या स्मितहास्यातच पत्राची खरी मजा आहे.
– अस्मिता प्रदीप येंडे