रेडा -खडकवासला कालव्याद्वारे इंदापूर तालुक्यासाठी हक्काचे आवर्तन शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाने तात्काळ सोडावे, पाण्यामुळे शेतीचे होणारे नुकसान खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे.
खडकवासलाची आवर्तने कमी करण्यात आली आहेत. पुणे शहरातून पाण्याची मागणी वाढल्याने त्याचा परिणाम आवर्तने सोडण्यावर झाला आहे. भरणे म्हणाले की, खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे; त्यामुळे प्रकल्पात दि.9 जुलैपर्यंत 9.67 टीएमसी पाणीसाठा झाला आहे, अशा स्थितीत असल्यामुळे या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या इंदापूर तालुक्यात मात्र जुलै महिना सुरू झाला तरी अद्याप पावसाने सुरुवात केली नाही. त्यामुळे तालुक्यात 55 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. आठ ठिकाणी चारा छावण्या सुरू आहेत, अशा स्थितीत खडकवासला कालवा आवर्तन सोडल्यास याचा या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी उपयोग होणार आहे.
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कालव्याला तत्काळ पाणी सोडणे गरजेचे होते. परंतु, प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पावसाचा अंदाज न घेता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे पाणी कालव्याला सोडले नाही. या वेळेस जर अधिकाऱ्यांनी मनमानी केली तर शेतकऱ्यांसमवेत रस्त्यावर उतरून संबंधितांना जाग आणली जाईल, त्यामुळे अधिकाऱ्यांनी मनमानी करू नये, असा इशारा भरणे यांनी दिला. तीन दिवसांत पावसाचा जोर वाढल्याने जलसंपदा विभागाला नदीला पाणी सोडावे लागले, हे पाणी उजनीमार्गे कर्नाटकात पोचले. परंतु या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील इंदापूर तालुक्यात पाणी आले नाही. त्यामुळे तलाव कोरडे राहिल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नियम बाजूला ठेवून तात्काळ कालव्याला पाणी सोडावे, अशी माझी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी आहे, असेही आमदार भरणे यांनी सांगितले.