प्रवाशांची गरज पाहून घेतले जातेय दुपटी – तिपटीने भाडे
निवडणुकांमुळे वाढली गर्दी
सध्या लोकसभा निवडणुका आहेत. उद्योगनगरीत लाखोंच्या संख्येने आलेले नागरीक मतदानासाठी आपल्या गावी जाण्यास इच्छुक असतात. 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होते, यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये व 18 एप्रिल रोजीदेखील पहाटेपासूनच प्रवाशांची प्रचंड गर्दी पहावयास मिळत होती. मंगळवारी आणि बुधवारी बहुतेक प्रवाशांना गावी जाण्यासाठी खासगी वाहन देखील मिळत नसल्याचे चित्र शहरात पहायला मिळाले. तसेच परप्रांतीय मतदार देखील या महिन्यामध्ये आपल्या गावाकडे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांची देखील खासगी बस संचालकांकडून अडवणूक करण्यात आली.
पिंपरी – उन्हाळा लागला की लग्नसराई व शाळांना सुट्टया असल्यामुळे अनेकांची गावी जाण्याची लगबग सुरु होते. यामुळे सार्वजनिक सेवा देणारी एसटी आणि रेल्वेचे आरक्षण फुल्ल होत आहे. तर, वाढती गर्दी आणि प्रवाशांची गरज ओळखून खासगी ट्रॅव्हल्स संचालक आणि एजेंटाच्या जोडगोळीने दरवाढ करत प्रवाशांची दुपटी-तिपटीने लूट केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहर उद्योगनागरी असल्यामुळे विविध राज्यातून व राज्याच्या विविध भागातून कामानिमित्त व शिक्षणानिमित्त अनेक जणांची शहरात ये-जा असते.
त्यात सण, लग्नसराई म्हटले की गावकडे जाण्यासाठी मोठी लगबग सुरु होते. त्यामुळे शहरातील एस.टी आगारात तुडूंब गर्दी होतांना दिसत आहे. तर, रेल्वेगाडयाचे आरक्षण तिकीट फुल्ल झाले आहे. सध्या एसटीकडून जादा बस सोडूनही तिकीट मिळत नसल्याने अनेकांना खासगी ट्रव्हल्सवर अंवलबून रहावे लागते. शहरातून वल्लभनगर आगारातून सोयीनुसार एसटी नसल्याने व तेथे जाण्यास वेळ घालण्याऐवजी खासगी ट्रॅव्हल्सकडे गर्दी वळू लागली आहे. शहरातील कोणत्याही चौकात आणि रस्त्यावर थांबणाऱ्या या ट्रॅव्हल्स बसेस सोयीच्या वाटू लागल्या आहेत. मात्र, याच फायदा घेवून अनेकांनी दरात वाढ केली आहे. ती वाढ दुप्पट ते तिप्पट असल्याने प्रवाशांना त्याची चांगलीच झळ बसत आहे.
वल्लभनगर आगार (एसटी) प्रशासनाकडून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी नागपूर, अमरावती, कोल्हापूर, दापोली, बीड, औरंगाबाद आणि सोलापूर या ठिकाणी बसची मागणी अधिक असते. लांब पल्ल्याच्या एसटीचे ऑनलाईन बुकींग करण्यात येत आहे. तर, काहींनी त्याचे आरक्षण केले आहे. मात्र, अनेकांना आगारातून तिकीट मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक प्रवाशांना खासगी वाहनांचा पर्याय अंवलबावा लागत आहे. याच प्रवाशांच्या मजबूरीचा फायदा खासगी वाहनचालक घेत आहेत.
याकडे आरटीओ कार्यालयाकडून सर्रास दुर्लक्ष केले जात असून, यामुळे खासगी वाहन चालकांचे फावते आहे. यावर आरटीओकडून कारवाई होणे अपेक्षित असते. मात्र, आरटीओ देखील अशा प्रसंगी डोळे झाकून घेत असल्याने प्रवाशांना कोणीच वाली नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
यामुळे शहरात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सर्रास खासगी ट्रॅव्हल्स धोकादायक रित्या व्यवसाय करीत आहेत. एसटी स्थानकाच्या जवळच ते थांबून प्रवाशांना अडवून प्रवासी नेण्याचे प्रकार घडत आहेत. तोच प्रकार पुणे-नाशिक आणि पुणे-बंगळूर रस्त्यावरही असल्याने खासगी ट्रव्हल्स चालकांनी आपले बस्तान बसवले आहे.