श्रीगोंदा – कुकडी प्रकल्प लाभ क्षेत्रात आवर्तन सुरू असून, हे आवर्तन फक्त पिण्यासाठी असून पाण्याचा अनधिकृत उपसा होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. अनधिकृत उपसा थांबविण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली.
या संदर्भात तहसीलदार महेंद्र माळी म्हणाले, कुकडीचे सुरू असलेले आवर्तन हे फक्त पिण्यासाठीच आहे. या पाण्याचा इतर कामांसाठी अनधिकृत उपसा होऊ नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. याचाच एक भाग म्हणून मंडळ निहाय भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये महसूल विभाग, पोलीस विभाग, पाटबंधारे विभाग, महावितरण या सर्व विभागांचे कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अवैध उपसा आढळून आल्यास संबंधित यांचे मोटारी जप्त करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या बाबींचा विचार करता लाभक्षेत्रातील सर्वांनी या निर्णयास सहकार्य करावे, असे आवाहन ही तहसीलदार माळी यांनी केले आहे.