-पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील घटना
-मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत
-दरड पहिल्या लेनवर कोसळल्याने जीवितहानी नाही
लोणावळा – पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील खंडाळा (बोरघाट) घाटातील आडोशी बोगद्याजवळ रविवारी (दि. 7) पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास एक मोठी दरड कोसळली. या दरडीमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने ही दरड पहिल्या लेनवर कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढला होता. शनिवारी सकाळीच लोणावळ्यातील यंदाच्या पर्जन्यमानाने “हजारी’चा टप्पा ओलांडला. लोणावळा परिसरात मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे खंडाळा (बोरघाट) घाटातील आडोशी बोगद्याजवळ किलोमीटर क्रमांक 41/500 येथे डोंगरावरून मोठी दरड कोसळली होती. घटनेची माहिती समजताच बोरघाट महामार्ग पोलीस व आयआरबी कंपनीचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मार्गावर कोसळलेली दरड बाजूला केली. त्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू केली. दरड हटविण्याच्या कामा दरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
दरम्यान वाहतूक जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांपासून लोणावळा खंडाळ्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. लोणावळा शहरात शनिवारी (दि. 6) सकाळी सात वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 24 तासांत तब्बल 173 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. एकीकडे लोणावळा शहरात मुसळधार पाऊस पडत असताना दुसरीकडे या पावसामुळे “ओव्हर फ्लो’ झालेले भुशी धरण तसेच फेसळत वाहणारे धबधबे यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी लोणावळा आणि खंडाळ्यात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
परिणामी शहरातील मुख्य कुमार चौकात राष्ट्रीय महामार्गावर मुंबई तसेच पुणे या दुतर्फा बाजूला सुमारे दोन ते तीन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही विस्कळीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी लोणावळा शहर पोलीस सातत्याने प्रयत्न करीत होते. मात्र वाहनांची संख्या जास्त वाढल्याने रात्री उशिरापर्यंत ही कोंडी कायम राहिली होती.
मुसळधार पावसामुळे झाड उन्मळून पडण्याच्या घटना
लोणावळा शहरात तसेच आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात देखील या मुसळधार पावसामुळे झाड उन्मळून पडण्याच्या काही घटना घडल्या. तुंगार्ली येथील स्मशानभूमीजवळ एक मोठे झाड रस्त्यावरच उन्मळून पडले. यामुळे या झाडाला लागून असलेल्या वीजवाहक तारांवर हे झाड पडल्याने या तारा तसेच झाड धोकादायक स्थितीत रस्त्यावर पडले होते. आणि त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.