कनौज – जातीयवादी आणि चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे भाजप केंद्रातील सत्तेतून बाहेर जाईल. आताची लोकसभा निवडणूक नमो, नमोचा जप संपवेल, अशा शब्दांत बसपच्या प्रमुख मायावती यांनी गुरूवारी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
उत्तरप्रदेशच्या कनौजमध्ये महाआघाडीची संयुक्त सभा झाली. त्या सभेला मायावती यांच्याबरोबरच सपचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि रालोदचे प्रमुख अजित सिंह हेही उपस्थित होते. मोदींचा उल्लेख त्यांच्या समर्थकांकडून नमो असा केला जातो. त्याचा संदर्भ देऊन मायावती म्हणाल्या, आताची निवडणूक नमो, नमो म्हणणाऱ्यांची राजवट संपवेल आणि जय भीम म्हणणाऱ्यांचा मार्ग मोकळा होईल. यावेळी चौकीदारीची नाटकबाजी चालणार नाही. मागील निवडणुकीत मोदींनी जनतेला अच्छे दिन दाखवण्याचे आश्वासन दिले. मात्र, गरीब, तरूण, दलित, ओबीसी आणि मुस्लिमांना अवघड काळातून जावे लागत आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. यावेळी मायावतींनी कॉंग्रेसवरही जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. सत्तेत असताना कॉंग्रेसने मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी केली नाही. त्या पक्षाने राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न सन्मान दिला नाही, असे त्या म्हणाल्या.