चौथ्या टप्प्यात 17 मतदारसंघात सरासरी 57 टक्के मतदान
मुंबई – राज्यात आज शेवटच्या टप्प्यात पार पडलेल्या मतदानावेळी कडक उन्हामुळे मतदानावर परिणाम होईला हा अंदाज आज मतदारांनी फोल ठरवला. लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यात सोमवारी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघरसह 17 मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 57 टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक आयोगाने वर्तवला. चौथ्या टप्प्यात 323 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले.
2014च्या तुलनेत यंदा 0.36 टक्के अधिक मतदान झाले आहे. त्यामुळे वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होणार हे 23 मे रोजी मतमोजणीतून दिसून येणार आहे. राज्यात तापमानाचा पारा वाढला असतानाही मतदारांचा उत्साह मात्र अजिबात कमी झालेला नसल्याचे दिसून आले. राज्यभरात मागील निवडणुकीपेक्षा यंदा रेकॉर्डब्रेक मतदान झाले.
राज्यभरात निवडणुक झालेल्या 17 मतदारसंघांपैकी बहुतांशी मतदारसंघात 2014च्या टक्केवारीपेक्षा अधिक मतदान झाले. निवडणूक आयोगाने सायंकाळी 6 वाजेपर्यंत दिलेल्या अंदाजित आकडेवारीनुसार नंदुरबारमध्ये 67.64 टक्के , धुळे- 57.29 टक्के, दिंडोरी-64.24 टक्के, नाशिक-55.41 टक्के, पालघर-64.09 टक्के, भिवंडी-53.68 टक्के, कल्याण-44.27 टक्के, ठाणे-49.95 टक्के, मुंबई उत्तर-59.32 टक्के, मुंबई उत्तर-पश्चिम-55.71 टक्के, मुंबई उत्तर-पूर्व-56.31 टक्के, मुंबई उत्तर-मध्य-52.84 टक्के, मुंबई दक्षिण-मध्य-55.35 टक्के, मुंबई दक्षिण-52.15 टक्के, मावळ-59.12 टक्के, शिरुर-59.55 टक्के आणि शिर्डी-60.42 टक्के इतके मतदान झाल्याचे निवडणून आयोगाकडून सांगण्यात आले. राज्यभरात एकूण सरासरी 57 टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
चार टप्प्यांत एकूण 60.68 टक्के मतदान
राज्यभरात चौथ्या टप्प्याच्या अंदाजित मतदानासह चार टप्प्यांत सरारसरी 60.68 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. राज्याच्या पहिल्या टप्प्यात 63 टक्के, दुसर्या टप्प्यात 62.88 टक्के, तिसर्या टप्प्या 62.36 टक्के तर चौथ्या टप्प्यात 57 टक्के मतदान झाले आहे. राज्यभरातील सुमारे 8 कोटी 85 लाख मतदारांपैकी 5 कोटी 37 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.