गेल्या निवडणुकात 59 पैकी भाजपाने जिंकल्या होत्या 44 जागा
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी रविवारी मतदान होत आहे. या टप्प्यात मतदान होणाऱ्या 59 पैकी 44 जागा भाजपकडे असून त्या कायम राखण्याचे आव्हान त्या पक्षापुढे आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये महाआघाडीचा भाजपला सामना करावा लागत आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कसोटी आहे. भोपाळ मतदारसंघात कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची लढत भाजप उमेदवारी प्रज्ञासिंग यांच्याशी होणार आहे. गुणा मतदारसंघात कॉंग्रेसनेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उत्तर प्रदेशात मतदान होत असलेल्या 14 पैकी 12 मतदारसंघांमध्ये गेल्या वेळी भाजपचे खासदार निवडून आले होते. हरियाणातील 10 पैकी सात जागा गेल्या वेळी भाजपने जिंकल्या होत्या. दोन जागा भारतीय लोकदल तर एक जागा कॉंग्रेसने जिंकली होती.
यंदा भाजप आणि कॉंग्रेस असा सामना होत आहे. हरियाणा विधानसभेची निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपल्याने लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासमोर आहे. लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरी झाल्यास त्याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो.
पश्चिम बंगालमध्ये मतदान होत असलेल्या सर्व आठ जागा तृणमूल कॉंग्रेसकडे आहेत. दिल्लीतील सातही जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. दिल्लीत भाजप, आम आदमी पार्टी आणि कॉंग्रेस अशी तिरंगी लढत होत आहे. सहाव्या टप्प्यात बिहार (8), हरियाणा (10), झारखंड (4), मध्य प्रदेश (8), उत्तर प्रदेश (14), पश्चिम बंगाल (8) आणि दिल्लीतील सात अशा 59 मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान होत आहे.