इंदापूर तालुक्यात जनावरांची संख्या मोठी असल्यामुळे व मागील काही वर्षापासून पाऊस समाधानकारक झाला नसल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या वतीने सुरू केलेल्या चारा छावण्यात हजारो जनावरांची मुक्कामी हजेरी लागली. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पशुधन कसेबसे वाचले आहे. शेतकऱ्यांच्या हाती कोणतेही हक्काचे पीक नसल्यामुळे आर्थिक अडचणीत शेतकरी सापडला आहे. जनावरांबरोबर शेतकऱ्यांनाही चारा छावण्यात मुक्काम ठोकावा लागत आहे. त्यामुळे जनावरांबरोबर माणसांच्या छावण्या खोलावे लागतील, अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे.
इंदापूर तालुका पूर्वी बागायती तालुका म्हणून पुणे जिल्ह्यात बागायती भागात अग्रेसर होता. याच तालुक्याला नीरा आणि भीमा या दोन नद्या वरदान लाभलेल्या असताना देखील शेतकऱ्यांच्या शेतीचा पाणीप्रश्न कधीही निकाली लागलेला दिसत नाही. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या संसारवर व मुक्या जनावरांवर होताना दिसत आहे.
इंदापूर बाजार समिती, नीरा भीमा कारखाना, सोनाईच्या वतीने व जय भवानी गड विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात चारा छावण्या सुरू आहेत. यापूर्वी चारा छावण्या सुरू करण्याची वेळ तालुक्यावर आलेली नव्हती. मात्र, नागरिक व शेतकऱ्यांना यंदा मुबलक पाणी न मिळाल्यामुळे चारा छावण्या अखेर सुरू कराव्या लागल्या. शासन नियमानुसार चाराछावण्या चालवल्या जातात, असे बोलले जाते. प
रंतु काही संस्था चारा छावण्या व्यवस्थितरित्या चालवताना दिसत आहेत. परंतु ज्या संस्था चारा छावण्यांमध्ये घोटाळा करीत आहेत. त्यांना मात्र, इंदापूर तालुक्यात कोठेही शासकीय नियमानुसार चाप बसलेला दिसत नाही. बाजार समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या चारा छावण्यांमध्ये जनावरांची संख्या मोठी दिसत आहे. सोनाई परिवाराच्या माध्यमातून चारा छावण्यात जनावरांच्या आरोग्याची परिपूर्ण काळजी तसेच पशुखाद्य व चारा याबाबत शेतकऱ्यांना सुख सुविधा मिळत आहे. त्यामुळे सोनाईने दुष्काळात मदतीचा हात दिला आहे.