गोवाहटी/शिलॉंग: नागरिकत्व नोंदणी विधेयकावरून संपूर्ण ईशान्य भारतात यावर्षी भाजपविरोधात वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत ईशान्य भारतात भाजपला फटका बसेल, असा अनेकांच अंदाज होता. मात्र तरिही भाजप आणि मित्र पक्षांना ईशान्येकडील राज्यांमधल्या 25 पैकी 18 जागांवर विजय मिळाला आहे. कॉंग्रेसला याठिकाणी केवळ 4 जाग मिळाल्या. तर कॉंग्रेसच्या सहकारी पक्षांना 2 आणि एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराला विजय मिळाला. नागरिकत्व विधेयकावरून आसाम, नागालॅन्ड, मणिपूर आणि मिझोराम या राज्यांमध्ये निर्माण झालेला भाजपविरोधतील असंतोष पूर्णपणे नाहिसा झाल्याचे हे निदर्शक होते.
जेंव्हा केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक 2016 आणायचे ठरवले तेंव्हा अनेक राजकीय विश्लेषकांकडून ते विधेयक ईशान्य भारताच्या एकसंधतेविरोधात असल्याचे बोलले जाऊ लागले होते. या विधेयकातून मुस्लिम बहुल बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील हिंदू, शिख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि पारशी शरणार्थ्यांना नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव मांडला होता. आसाम, मणिपूरसह मिझोराम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये या विधेयकाच्याविरोधात उग्र निदर्शनेही झाली होती. हे विधेयक राज्यसभेत मांडण्यापूर्वीच हे आंदोलन भडकले होते.
त्यामुळे हे विधेयक भाजपला मारक ठरण्याचा अंदाज भाजप आणि मित्र पक्षांनी या भागात विशेषतः आसाममध्ये खोटा ठरवला. आसाममध्ये 14 पैकी 9 जागा भाजपने जिंकल्या. 2014 मध्ये भाजपने 7 जागा जिंकल्या होत्या.
अरुणाचल प्रदेशात आणि त्रिपूरामध्ये असलेल्या प्रत्येकी दोन्ही जागा भाजपने मिळवल्या. मणिपूरमध्ये भाजप आणि नागा पीपल्स फ्रंटने प्रत्येकी 1 जाग जिंकली. “एनडीए’तील मित्र पक्षांनी सिक्कीम, मिझोराम आणि नागालॅन्डमधील एकमेव जागाही जिंकल्या. कॉंग्रेसला मेघालयाच्या शिलॉंगमधील एका जागेवर विजय मिळाला.