कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत निर्णय
मुुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीत समविचारी पक्षांना सहभागी करून घेण्याबाबत आघाडीच्यावतीने पत्र दिले जाणार आहे. या पत्राला समविचारी पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे, असा निर्णय आज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभेची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांची संयुक्त बैठक आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सरकारी निवासस्थानी पार पडली. पहिल्या बैठकीत जागावाटपाचे सूत्र किंवा कोणत्या पक्षाला किती जागा यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. तर वंचित बहुजन आघाडीसह बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, जनता दल, रिपब्लिकन पक्षाचे विविध गट यांना पत्र लिहिण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आघाडीचा मुख्यमंत्री बसवायचा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मित्र पक्षांना किती जागा द्यायच्या आणि कोणाला सोबत घ्यायचे याचा निर्णय पुढे होईल. बैठकीत मनसेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.
बैठकीला कॉंग्रेसच्यावतीने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे, नसीम खान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.