माढ्याच्या निकालावर ठरणार पुढील वाटचाल : सर्वांच्या नजरा आता निकालाकडे
सम्राट गायकवाड
सातारा – राजकीय कारर्किदीला सुरूवात केल्यापासून राष्ट्रवादीला नामोहरम करण्याची एकही संधी न सोडलेले आ. जयकुमार गोरे यंदाच्या माढा लोकसभा निवडणुकीत खेळलेल्या चालीत यशस्वी होतील का? अशी चर्चा सध्या जिल्ह्यात रंगू लागली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा पाडाव करण्यासाठी आ. गोरे यांनी चक्क भाजपच्या उमेदवाराला कार्यकर्त्यांच्यामार्फत पाठींबा जाहीर केला. त्यांच्या या खेळीने जिल्ह्यासह महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. मात्र, आता मतदान प्रक्रिया पूर्ण होवून निकालाची तारीख जसजशी जवळ यायला लागली आहे, तसतसा जिल्ह्यात चर्चांचा जोर वाढू लागला आहे.
आ. जयकुमार गोरे यांनी कॉंग्रेसच्या तिकीटावर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून राजकीय कारर्किदीला सुरूवात केली. त्यानंतर विधानसभेला पहिल्यांदा अपक्ष तर दुसऱ्यांदा कॉंग्रेसच्या चिन्हावर बाजी मारली आहे. दरम्यानच्या कालावधीत झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला. या सर्व लढाया त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात लढल्या आणि जिंकल्या.
एकूणच आ. गोरे यांची घौडदौड सुरूच राहिल्याने राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी त्यांना सर्वोतोपरी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना माण पंचायत समिती व म्हसवड नगरपालिकेची निवडणूक वगळता यश मिळाले नाही. दरम्यानच्या कालावधीत सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने स्वपक्षाचे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आ. गोरे यांनी विरोधी सर्व सदस्यांची मोट बांधत अविश्वास ठराव यशस्वी होवू दिला नाही. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला गेला.
त्यानंतर आ. गोरे यांना रोखण्यासाठी बंधू शेखर गोरे यांचे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी राष्ट्रवादीने शेखर गोरे यांना सातारा-सांगली विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारीही दिली. मतदारसंघात राष्ट्रवादीच्या मतदारांची संख्या अधिक होती. तर दुसऱ्या बाजूला आ. गोरे यांचे राजकीय गुरू असलेले स्व. पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
कदम यांच्याकडे राष्ट्रवादीच्या तुलनेत अल्प मते होती. मात्र, आ. गोरे यांनी सर्वोतपरी प्रयत्नांची पराकाष्टा केली अन् मोहनराव कदम यांची विजयश्री खेचून आणली. हा राष्ट्रवादीला दुसरा मोठा धक्का आ. गोरे यांनी दिला. आता आ. गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने तिसरा मोठा धक्का देण्याची चाल खेळली आहे. माण-खटाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच त्यांचा शत्रु राहिला व भविष्यात ही राहणार आहे. त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होवू नये आणि झालाच तर माण-खटाव मतदारसंघातील त्या उमेदवाराला अल्प मते मिळाली पाहिजेत.
या हेतूने आ. गोरे यांनी भाजपच्या उमेदवाराला कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर व कार्यकर्त्यांमार्फतच पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. त्यामुळे विशेषत: माण-खटाव मतदारसंघातील मतदारांच्या नजरा आता निकालाकडे असून तो कसा लागतो? कोणता उमेदवार विजयी होतो? अन् माण-खटावमध्ये कोणत्या उमेदवारा किती मताधिक्य मिळते? यावरच आ. गोरे यांची पुढील वाटचाल स्पष्ट होणार आहे.