मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्या जागा वाटपाच्या चर्चेला सुरूवात झाली आहे. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने 50-50 चा फॉर्म्युला करण्याची मागणी केली आहे तर या फॉर्म्युलाचा कॉंग्रेसने विरोध दर्शवला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील दोन्ही पक्षांच्या सुमार कामगिरीचा विचार करून दोन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी चर्चा केली. त्यासाठी पहिली फेरी नुकतीच पार पडली मात्र यात दोन्ही पक्षांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने कोणताही निर्णय होवू शकला नाही. लोकसभेत कॉंग्रेसला एक जागा मिळाली तर राष्ट्रवादीचे पाच खासदार निवडुण आले त्यामुळे राष्ट्रवादीकडून 50-50 चा फॉर्म्युला करण्याची मागणी केली मात्र त्याला कॉंग्रेसने सपशेल नकार दिला आहे. कारण कॉंग्रेसने आता 2014 च्या जागा वाटपानुसार यावेळीदेखील देण्याची मागणी केली आहे. म्हणजेच 2014 च्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांसह ज्या दोन जागांवर दोन क्रमांकावर ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या पक्षाला ती जागा मिळावी अशी मागणीदेखील कॉंग्रेसने केली आहे. मात्र या चर्चेवर दोन्ही पक्षाचे एकमत झाले नाही.