घातक प्लांट बंद करण्याच्या ग्रामपंचायतीच्या
मागणीकडे दुर्लक्ष करीत उत्पादन सुरू
नीरा – नीरा-निंबूत येथील ज्युुबिलंट कंपनीचा ऍसिटिक अनहायड्राईड प्लांट बंद करावा, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतल्यानंतर याबाबत ग्रामपंचायतीने कंपनीला पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट केलेली असताना कंपनीने याबाबत कोणतीही दखल न घेता नागरिकांच्या जीवितास धोकादायक असलेला ऍसिटिक अनहायड्राईड प्लांट सुरू केला आहे. यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. यामुळे कंपनीच्या विरोधात कायदेशीर मार्गाने लढा उभारण्याची तयारी ग्रामपंचायत सुरू केली आहे. विशेष म्हणजे याबाबत परिसरातील अन्य ग्रामपंचायतींनीही याबाबत एकमुखी ठराव केला आहे.
निंबूत (ता. बारामती) येथे आज ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्य व नागररिकांत बैठक झाली. यावेळी कंपनी तसेच झालेल्या अपघाताबाबत नागरिकांच्या प्रतिक्रियांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकरी कृती समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे, सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, माजी संचालक दिलीप फरांदे, निंबुतचे सरपंच राजकुमार बनसोडे, ग्रामसेवक सचिन निंबकर, तलाठी सदस्य व नागरिक उपस्थित होते.
यावेळी नागरिकांची बाजू ऐकून घेण्यासाठी कंपनीच्यावतीने ज्युुबिलंट भारतीय फाउंडेशनचे अजय ढगे उपस्थित होते. यावेळी सतीश काकडे यांनी ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आलेल्या कारवाईबद्दल माहिती घेतली. तर, याबाबत अपघाताच्या दुसऱ्या दिवशीच पहिले पत्र दिले असल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले. या अपघाताबद्दलची माहिती ग्रामपंचायतीने मागविली होती, याकरिता दुसरे पत्र कंपनीला देण्यात आले. ग्रामपंचायतीची परवानगी घेतल्याशिवाय उत्पादन सुरू करू नये, याबाबतही कंपनीला पत्राद्वारे कळविण्यात आले होते. मात्र, कंपनीने याबाबत कोणतेही उत्तर दिले नाही. याउलट आम्ही उत्पादन सुरू केले असल्याचे पत्र कंपनीकडून ग्रामपंचायतीस देण्यात आले. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनासह नागरिकांत कंपनी विषयी संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कंपनीला नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा कोणताच अधिकार नाही, असे सांगून शहाजी काकडे यांनी संबंधित उत्पादनाचा प्लांट बंद करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, दोन तास सुरू असलेल्या विशेष बैठकीत ज्युुबिलंट कंपनीच्या एकूणच कारभारा विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. कंपनीतून पूर्वी प्रदूषण होत असले तरी घातक प्लांट येथे नव्हते, त्याचबरोबर असा कोणता घातक प्लांट येथे सुरू होणार असल्याबाबत ग्रामपंचायत अथवा कोणत्याही नागरिकास याची माहिती नव्हती. मात्र, कंपनीत झालेल्या अपघातामुळे ही बाब उघड झाली आहे. या भागातील लाखो नागरिकांचा जीवन यामुळे धोक्यात असून कंपनीतील घातक प्लांट बंद केला नाही तर कायदेशीर मार्गाने कंपनीला वठणीवर आणावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. नीरा, पाडेगावसह परिसरातील अनेक ग्रामपंचायतीनींही हा घातक प्लांट बंद करण्याबाबतचे ठराव केले आहेत. अशावेळी निंबूत ग्रामपंचायत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज, निंबूत ग्रामपंचायतीनेही कंपनी तसेच या प्लांटबाबत भूमिका स्पष्ट करीत कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
अपघाताचे कारण का सांगत नाहीत?
अनहायड्राईडच्या टाकीमध्ये पाणी गेल्याने या रसायनाचा पाण्याची संयोग होऊन टाकीचा स्फोट झाला होता.त्यामुळे हा विषारी वायू वातावरणात पसरून 55 कामगार जखमी झाले होते. यातील एका कामगाराचा मृत्यू झाला. यानंतर शासनाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची चौकशी केली व तात्पुरत्या काही सुधारणा करून हा प्लांट पुन्हा सुरळीत सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, अपघाताचे कोणतेही कारण आजपर्यंत सुरक्षा विभागाकडून का सांगण्यात आलेले नाही. केवळ चौकशी चालू आहे एवढेच उत्तर कंपनी किंवा सुरक्षा अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.