जळगाव – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या पक्षात राहायला तयार नाहीत. त्यामुळेच आपल्या मुंबईतील बंगल्यावर नेत्यांच्या रांगा लागलेली असते, असा दावा करत भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला. तसेच विधानसभा निवडणूकीतही भाजपच यश मिळविली असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जळगावात झालेल्या भाजपच्या विस्तार सभेत गिरीश महाजन बोलत होते. महाजन म्हणाले, आघाडीचे नेते भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याने पुढे पाहू, असे म्हणून आपल्याला त्यांना टाळावे लागत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मिळून 50 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा होत असतो. भाजपच्या 42 कार्यकर्त्यांचे कम्युनिस्टांनी खून केले आहेत. तरीसुद्धा कार्यकर्ते मागे हटले नाहीत. गेल्या निवडणुकीमध्ये आपण ठरवलेल्या आकड्यांपेक्षा जास्त जागा निवडून आल्याने आपल्याला सुद्धा धक्का बसला, अशी कबुली गिरीश महाजन यांनी दिली.
दरम्यान, भाजपच्या या विस्तारसभेत एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. त्याचवेळी एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. त्यामुळे लोकसभा उमेदवार निवडून आणण्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांचे नव्हे, असा टोला लगावत खडसे यांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.