नवी दिल्ली – भारताने उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची गेल्या मार्च महिन्यात चाचणी घेऊन अंतळातील एक उपग्रह नष्ट केला होता. त्यातून अंतराळात निर्माण झालेल्या कचऱ्याबद्दल नासासह अन्य वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली होती. पण यातील बराच कचरा आता नष्ट झाला असून उर्वरीत कचराही लवकरच नाहीसा होईल असे डीआरडीओचे अध्यक्ष जी सतीश रेड्डी यांनी म्हटले आहे.
आयडीएसए संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादाच्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की हा कचरा आपोआप नष्ट होईल हे मी या आधीच सांगितले होते. त्यानुसार आम्हाला आत्ता जी माहिती मिळाली आहे त्यानुसार अंतराळातील बराच कचरा नष्ट झाला असून उर्वरीत कचराही लवकरच नाहीसा होईल.
आम्ही स्वता अंतराळातील कचऱ्याच्या स्थितीबाबत सातत्याने माहिती घेत असून त्या बाबतच्या स्थितीचेही आम्ही नियंत्रण करीत आहोत. भारताने पृथ्वी पासूनच्या तीनशे किमी अंतरावरील अंतरीक्षात उपग्रह नष्ट करण्याचा प्रयोग मिशन शक्ती अंतर्गत केला होता. ही अंतरीक्ष कक्षा अगदीच कमी अंतरावर असल्याने त्याचा अंतराळातील इतर घडामोडींवर विपरीत परिणाम होणार नाही याची आधीच दक्षता घेण्यात आली होती असे ते म्हणाले.