फक्त 5 टक्के बियाणे विक्री
डिकसळ – आषाढीची वारीला आठवडा उलटला तरी देखील पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या रखडल्या असल्याने इंदापूर तालुक्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे. तर या खरीप हंगामात केवळ पाच टक्केच बियाणांची विक्री झाल्याचे बियाणे विक्रेते संजय ननवरे यांनी सांगितले.
पुणे शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावून खडकवासला धरण भरले मात्र, ग्रामीण भागात पेरण्या करण्यायोग्य दमदार पाऊस झाले नसल्याने अनेक जमिनी भेगाळलेल्याच आहेत. तलाव, विहिरी, कूपनलिका अद्याप कोरड्याच असल्याने पशुधन जगविने देखील जिकिरीचे बनत चालले आहे. तालुक्यातील काही भागात चारा छावण्या सुरू असल्याने मोठा आधार पशुधन जगविण्यासाठी होतो आहे तर अनेक गावांची पाण्यासाठी पायपीट थांबलेली नाही. जुलै निम्मा संपला तरी पावसाची समाधानकारक हजेरी नसल्याने बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. दरवर्षी ऊस लागवडीला 15 तारखेपासून सुरुवात होते; मात्र यंदा लागवडीलायक पाऊस झाला नसल्याने शेतकरी धास्तावला आहे.