मुंबई: राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आज पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर बरसले आहेत. यावेळी एकनाथ खडसे हे विरोधी पक्षातील नेत्यांपेक्षाही अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी खडसेंनी आदिवासी भागातील कुपोषणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर आदिवासी विकास मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर खडसे चांगलेच संतापलेले दिसून आले. कुपोषणाची परिस्थिती भयंकर आहे. त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान खडसेंनी असाही दावा केला की, कुपोषणाचे सर्वाधिक बळी हे युती सरकारच्या काळामध्येच गेले आहे.
एकनाथ खडसेंच्या या आक्रमकपणामागे एक दुसरे कारण असल्याचीही चर्चा सध्या भाजपमध्ये आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच करण्यात आला. पण यावेळी एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. यामुळे खडसे खूपच नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी दिल्ली दरबारी देखील कळवली. मात्र, त्याचा फार काही फायदा झाल्याचे अद्याप दिसून आले नाही.
आता विधानसभा निवडणुका या अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशावेळी खडसेंसारख्या मोठ्या नेत्याची नाराजी पक्षाला भोवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण प्रकरणी नेमकी कशी भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवाय खडसे देखील कोणता राजकीय डाव टाकतात यावर देखील बरंच काही अवलंबून असणार आहे. विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशावेळी खडसेंसारख्या मोठ्या नेत्याची नाराजी पक्षाला भोवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण प्रकरणी नेमकी कशी भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.