नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांना आज एका व्यक्तीने रोड शो दरम्यान श्रीमुखात भडकावली. मोती नगर भागामध्ये झालेल्या “आप’च्या रोड शो दरम्यान हा प्रकार घडला. या रोड शो मध्ये सहभागी होण्यासाठी केजरीवाल उघड्या जीपमध्ये उभे होते. त्याचवेळी या हल्लेखोराने जीपच्या बॉनेटवर चढून केजरीवाल यांच्यावर हल्ला केला. मात्र त्यानंतर लगेचच या हल्लेखोराला “आप’च्या कार्यकर्त्यांनी खाली खेचले. पोलिसांनी त्याला कार्यकर्त्यांच्या तावडीतून सोडवले आणि ताब्यात घेतले. या हल्लेखोराचे नाव सौरभ असून तो सुट्या भागांचा व्यापारी असल्याचे समजते आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत.
हा हल्ला विरोधकांनी घडवून आणल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेमध्ये अक्षम्य निष्काळजीपणा दाखवल्यामुळेच त्यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे, असे “आप’ने म्हटले आहे.
केजरीवाल यांना झालेल्या या मारहाणीबद्दल उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना जबाबदार धरले आहे. “केजरीवाल यांची हत्या व्हावी, असे मोदी आणि शहा यांना वाटते आहे का ? गेल्या पाच वर्षात मोदी-शहा मिळून केजरीवाल यांचा निवडणूकीत पराभव करू शकलेले नाहीत. आता केजरीवाल यांना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा भ्याडपणा आहे.’ असे सिसोदीया यांनी ट्विटरवरच्या संदेशामध्ये म्हटले आहे.
तर केजरीवाल यांना विरोध करणे म्हणजे त्यांच्यावर शारीरिक हल्ला करणे असा समज रुढ करण्यात आला असल्याची टीका “आप’चे आमदार सौरभ भारद्वाज यांनी केली आहे.
यापूर्वीही केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचे प्रसंग घडले आहेत. गेल्यावर्षी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेरच एका व्यक्तीने त्यांना धक्काबुक्की केली होती आणि त्यांच्यावर मिरचीपूड फेकली होती. लोकसभेच्या 2014 च्या निवडणूकीतही त्यांना अशाप्रकारे मारहाण केली गेली होती.