भिगवण – आईच्या मृत्यूनंतर त्यांच्या आठवणी आणि स्मृती जोपासण्यासाठी रक्षा आणि अस्थीचे वृक्षारोपण करून जतन करण्याचा सामाजिक पायंडा खडकी येथील रहिवाशी संदीप काळे आणि त्यांच्या परिवाराने जोपासला आहे.
मानवाचा मृत्यू झाला की शरीराची माती होते; आत्मा इहलोक सोडून परलोकात जातो. उरते ते नश्वर शरीर! अशी धारणा भारतीय संस्कृतीमध्ये आहे. एकीकडे अस्थिविसर्जनाच्या माध्यमातून जलप्रदुषणाची समस्या गंभीर बनत असतानाच पारंपरिक प्रथेला फाटा देत खडकी येथील रहिवाशी व जलसंपदा विभाग शेठफळगढे शाखेतील कर्मचारी संदीप काळे व त्यांच्या परिवाराने रक्षा सावडण्याचा कार्यक्रमानंतर आपल्या मातोश्रीची रक्षा व अस्थी नदीमध्ये न फेकता शेतात वृक्षारोपण करून स्मृती जतन करण्याचा नवीन पायंडा पाडला.
संदीप यांच्या मातोश्री नंदाबाई महादेव काळे यांचे वयाच्या 65वर्षी निधन झाले. शनिवारी रक्षा सावडण्याचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर काळे परिवार व त्यांच्या पाहुण्यांनी आपल्या शेतामध्ये आंबा, पेरू, चिकू, फणस, मोसंबी या फळ झाडांचे वृक्षारोपण करीत त्यामध्ये रक्षा मिश्रित करून जतन करून ठेवल्या. काळे परिवाराने समाजाला आदर्शवत संदेश दिला आहे. अस्थी विसर्जनातील रक्षेमुळे नदीमध्ये होणारे प्रदूषण टाळण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे खडकी परिसरात स्वागत होत आहे.