सोनेभद्रा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील सोनेभद्रा येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार टीका करत मतदारांना ‘महामिलावटी आघाडीला’ मतदान न करण्याचं आव्हान केलं.
“आपल्या गुप्तचर यंत्रणांना या ‘महामिलावटी आघाडीच्या’ सरकारनं दुबळं बनवलं होतं मात्र जेव्हा केंद्रात वाजपेयीचं सरकार आलं तेव्हा भारतीय गुप्तचर संघटनांना बळकटी देण्यात आली.” असा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला.
१९९८च्या पोखरण येथील अणुचाचणीला आजच्या दिवशी २१वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी शास्त्रज्ञांचे आभार मानतानाच विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “जर तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्ती असेल तर तुम्ही देशाच्या सुरक्षिततेसाठी काय करू शकता याच उत्तम उदाहरण म्हणजे अटलजींच्या काळामध्ये झालेली पोखरणची अणुचाचणी आहे. मात्र अटलजींच्या सरकारनंतर पुन्हा महामिलावटी सरकार सत्तेत आल्यानं देशासमोर सुरक्षाविषयक अडचणी निर्माण झाल्या.”
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसनेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून देखील काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसला असलेली गुर्मी दिसून येते.”