दररोज 5000 यात्रेकरूंना परवानगी देणार
अटारी/ नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तानदरम्यान आज कर्तारपूर कोरिडोर संदर्भातील चर्चेची दुसरी फेरी झाली. या मार्गावरून जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेबाबतच्या संभाव्य धोक्यांची जाणीव भारताने पाकिस्तानला या चर्चेत करून दिली. कोणत्याही गट अथवा व्यक्तीच्या भारताविरोधी कारवाया होऊ दिल्या जाणार नसल्याची ग्वाही पाकिस्तानच्यावतीने देण्यात आली. कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट द्यायला जाणाऱ्या भारतीय पासपोर्टधारक अणि ओसीआय कार्ड धारक यात्रेकरूंना व्हिसा मुक्त प्रवेशासाठी पूल बांधण्यास पाकिस्तानने तत्वतः मान्यताही दिली आहे.
तसेच या कोरिडोरवरून दिवसाला 5000 यात्रेकरूंना जऊ दिले जाईल. तसेच विशेष कार्यक्रमाच्यावेळी 10 हजार अतिरिक्त यात्रेकरूंनाही कोणत्याही धार्मिक अटींशिवाय जाऊ दिले जाणार आहे.
पाकिस्तानने सुचवलेला
पकिस्तानने कर्तारपूरच्या कमिटीवर खलिस्तानी व्यक्तीची नियुक्ती केली होती. त्याचा संदर्भ देऊन भारताने दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये अटारी-वाघा सीमेवर झालेल्या या चर्चेदरम्यान सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. यात्रेत अडथळे आणण्यासाठी या कोरिडोरचा गैरवापर करू दिला जाणार नाही, अशी पाकिस्तानकडून हमी देखील देण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
यात्रेकरूंच्या सोयीसाठी अवश्यकता भासल्यास कर्तारपूर साहिब गुरुद्वरामध्ये भारतीय वकिलातीत प्रतिनिधी उपस्थित असण्याचीही मागणी भारताने केली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व गृहमंत्रालयातील सह सचिव एससीएल दास यांनी केले. गृह, परराष्ट्र, संरक्षण मंत्रालयाबरोबरच पंजाब सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारीही या शिष्टमंडळामध्ये सहभागी झाले होते. कर्तारपूर कोरिडोरशी संबंधित कराराच्या मसुद्याला अंतिम स्वरुप देण्याची प्रगती या बैठकीदरम्यान झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.