इस्लामाबाद – कर्तारपुर कॉरिडॉर विषयीच्या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतातील निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर चर्चा सुरू होईल अशी अपेक्षा पाकिस्तानने व्यक्त केली आहे. भारतातील पंजाब राज्यातल्या गुरूदासपुर जिल्हयातील डेराबाबा नानक गुरूद्वारा आणि पाकिस्तानच्या नोरवाल भागातील दरबार साहिब गुरूद्वारा यांना जोडणाऱ्या या कॉरिडॉरला कर्तारपुर कॉरिडॉर असे म्हणतात.
शिख भाविकांना भारतातून पाकिस्तानातील या गुरूद्वाराला कोणत्याही अडथळ्याशिवाय तेथे जाता यावे यासाठी हा कॉरिडॉर सुरू करण्यात आला आहे. या विषयीच्या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी आमच्या कडून कोणताही विलंब झालेला नाही. पण भारताने मात्र या घडीला याविषयी चर्चा करण्यास असमर्थता दर्शवली होती त्यामुळेच हा करार लांबला आहे असे पाकिस्तानी सूत्रांचे म्हणणे आहे.
या कॉरिडॉर विषयीच्या तांत्रिक मुद्द्यावर 16 एप्रिल रोजी झिरो पॉईन्टवर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली होती. पाकिस्तानने शिख गुरूद्वारा प्रबंधक समितीवर अनेक खलिस्तानी प्रतिनिधींना सहभागी करून घेतल्यामुळे भारताने त्याविषयावरील करारावर चर्चा करण्यास नाराजी दर्शवली होती. पाकिस्तानातील हा गुरूद्वारा भारतातील गुरूद्वारापासून जेमतेम चार किमी अंतरावर आहे. हा कॉरिडॉर गुरू नानक यांच्या जयंतीपासून म्हणजे येत्या नोव्हेंबर पासून सुरू होईल अशी अपेक्षा पाकिस्तानने व्यक्त केली आहे.