आघाडी सरकारपुढचे संकट टळणार की वाढणार?
बंगळूर: कर्नाटक मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर 12 जूनचा मुहूर्त मिळाला आहे. तो विस्तार कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकारपुढील अस्थिरतेचे संकट टाळणार का, याबाबत उत्सुकता आहे.
मागील काही काळापासून कर्नाटकातील कॉंग्रेसच्या काही आमदारांनी बंडखोरीचा पवित्रा स्वीकारला आहे. तशातच लोकसभा निवडणुकीत त्या राज्यात सत्तारूढ आघाडीला नामुष्कीजनक पीछेहाट स्वीकारावी लागली. त्यामुळे कॉंग्रेस आणि जेडीएस या मित्रपक्षांमधील संबंध ताणले गेल्याचे चित्र आहे. त्या पीछेहाटीनंतर कॉंग्रेसचे बंडखोर आमदार कधीही भाजपच्या गोटात दाखल होतील, अशी चर्चा सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर, सत्तारूढ आघाडीतील अस्वस्थता दूर करण्यासाठी आणि सरकारवरील अस्थिरतेचे सावट हटवण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराचा उपाय शोधण्यात आला आहे. त्या बहुप्रतीक्षित विस्ताराची तारीख मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी शनिवारी जाहीर केली. राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी विस्ताराच्या मुहूर्ताविषयीची माहिती दिली.
कर्नाटकमधील सत्तावाटपाच्या सुत्रानुसार कॉंग्रेसच्या वाट्याला 22 तर जेडीएसच्या वाट्याला 12 मंत्रिपदे आली आहेत. त्यातील जेडीएसच्या वाट्याची 2 आणि कॉंग्रेसच्या वाट्याचे 1 अशी 3 मंत्रिपदे सध्या रिक्त आहेत. मात्र, मंत्रिपदाची अपेक्षा बाळगून असणाऱ्या दोन्ही पक्षांमधील आमदारांची संख्या कितीतरी अधिक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराने सरकारपुढील धोका टळणार की आणखी वाढणार ते लवकरच स्पष्ट होईल.