एअर इंडिया, टपाल खात्याची बिकट परिस्थिती
बेगुसराय – पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज 20 तास काम करतात म्हणूनच देश उद्ध्वस्त झाला आहे अशी टीका कन्हैयाकुमार याने ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. एअर इंडिया, बीएसएनएल, एचएएलनंतर आता भारतीय टपाल खातेही आर्थिक संकटात सापडल्याचे कन्हैयाकुमारने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कन्हैयाकुमारने म्हणतो की, एअर इंडिया, बीएसएनएल, एचएएलनंतर आता भारतीय टपाल खात्याचीही परिस्थिती बिकट झाली आहे. टपाल खात्याला 15 हजार कोटींचा तोटा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या वृत्तानुसार सरकारच्या मालकीच्या इंडिया पोस्टला (भारतीय टपाल खाते) मोठा तोटा सहन करावा लागत आहे. या कंपनीच्या तोट्याची आकडेवारी ही बीएसएनएल आणि एअर इंडियाच्या तोट्याच्या आकड्यांहून अधिक आहे.
2018-19 च्या आर्थिक वर्षात भारतीय टपाल खात्याला एकूण 15 हजार कोटींचा तोटा झाला आहे. मागील तीन वर्षांमध्ये भारतीय टपाल खात्याच्या होणाऱ्या तोट्याचे प्रमाण 150 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे सर्वाधिक तोट्यात असणाऱ्या सरकारी कंपन्यांच्या यादीत टपाल खात्याने एअर इंडिया आणि बीएसएनएललाही मागे टाकले आहे. याच बातमीच्या पार्श्वभूमीवर कन्हैयाकुमार यांनी मोदींना लक्ष्य केले आहे.
बेगुसराय मतदारसंघात भाजपचे उमेदवार गिरीराज सिंह, राष्ट्रीय जनता दलाचे तन्वीर हसन आणि कन्हैयाकुमार यांच्यात तिरंगी लढत होत आहे. भाजपने गिरीराज सिंह यांना मतदारसंघ बदलून बेगुसरायमध्ये पाठविल्याने ते सुरुवातीला नाराज होते. पण नंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची नाराजी दूर केली आणि ते लढण्यास तयार झाले. कन्हैयाकुमार रिंगणात असल्याने बेगुसराय मतदारसंघाकडे राष्ट्रीय पातळीवरील माध्यमे आणि राजकीय तज्ज्ञांचे लक्ष गेले आहे.