कंगनाने कोणाशीही पंगा घेतला की त्यावर किमान आठवडाभर तरी चर्चा चालते. कंगनाला सारखे कोणाशी भांडल्याशिवाय चैन पडत नाही. तिने आतापर्यंत किमान अर्धा डझनवेळा भांडणे केली असतील. त्यापैकी फारच कमी वेळेस तिला नमते घ्यावे लागले आहे. मात्र, तिने पत्रकारांबरोबर पंगा घेतल्याने एकता कपूर अडचणीत सापडली. कंगनाच्या स्वभावामुळे पत्रकारांची माफी मागण्याची नामुष्की एकतावर आली.
‘जजमेंटल है क्या’च्या सॉंग लॉंच दरम्यान कंगनाने पत्रकाराबरोबर वाद घातला होता. एका आघाडीच्या वृत्तसंस्थेच्या पत्रकारावर कंगनाने भर पत्रकार परिषदेमध्येच आरोप करायला सुरुवात केली होती. ‘तुझे विचार घाणेरडे असून तू माझ्याविरोधात मोहीम राबवत आहे.’, असा आरोप कंगनाने केला. पत्रकाराने पूर्ण प्रश्न विचारण्याआधीच कंगनाने त्याच्यावर अनेक आरोप लगावले यात ‘मणिकर्णिका’दरम्यान तिच्याविरोधात मोहीम राबवल्याचा प्रमुख आरोप होता. या परिषदेचा व्हिडीओही व्हायरल झाला. इथून सुरू झालेला वाद हा नंतर वाढतच गेला. कंगनाने पत्रकारासोबत केलेल्या उद्धट वागण्याची दखल ‘द एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडिया’ने घेतली आणि कंगनाने माफी मागावी अशी मागणी केली.
रविवारी ‘जजमेंटल है क्या’ची निर्माती एकता कपूर आणि अभिनेता राजकुमार रावही या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. कंगना आणि एकता या दोघींनीही झालेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी देण्यात येणार नाही असे पत्रकारांनी स्पष्ट केले आहे. या पत्रानंतर बालाजी टेलिफिल्म्सने पत्रकारांची माफी मागितली आहे. या वादात जे कोणी सहभागी होते त्यांची स्वत:ची काही मते आणि भूमिका होत्या पण हा वाद आम्ही आयोजित केलेल्या चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये झाला आहे म्हणून निर्माते या नात्याने आम्ही सर्वांचीच माफी मागतो. जे झाले ते वाईटच होते, असे म्हणत बालाजी टेलिफिल्म्सनं माफी मागितली आहे.
#JudgeMentallHaiKya pic.twitter.com/vE7pN5pKhH
— BalajiMotionPictures (@balajimotionpic) July 10, 2019