पुणे – भारतातील एक महत्त्वपूर्ण गिर्यारोहण संस्था गिरीप्रेमींच्या संघाने जगातील तिसरे उंच शिखर माऊंट कांचनजुंगावर यशस्वी चढाई करून भारताचे नव्हे तर जगाच्या गिर्यारोहण इतिहासामध्ये नवा अध्याय रचला. ही चढाई यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या गिर्यारोहक संघाने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोहिमेतील गिर्यारोहकांचे कौतुक केले.
गिरीप्रेमी संस्थेतील 10 गिर्यारोहकांनी 15 मेच्या पहाटे जगातील तिसरे उंच शिखर माउंट कांचनजुंगावर यशस्वी चढाई केली. ही मोहीम कांचनजुंगा शिखर चढाई करण्यात यशस्वी ठरलेली सर्वांत मोठी व सर्वांत पहिली नागरी मोहीम ठरली आहे. एकाच दिवशी एकाच संस्थेतील दहा गिर्यारोहकांनी कांचनजुंगा शिखरमाथ्यावर चढाई करण्याची पहिलीच वेळ आहे.
यातून एक नवा विश्वविक्रम गिरीप्रेमींच्या गिर्यारोहकांनी प्रस्थापित केला आहे. त्यामुळेच ही मोहीम वैशिष्ट्यपूर्ण ठरली होती. या मोहिमेबाबत माहिती देण्यासाठी गिरीप्रेमींच्या संघाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यामध्ये कांचनजुंगा मोहिमेचे नेते उमेश झिरपे, गिरीप्रेमींचे उपाध्यक्ष चंदन चव्हाण, एव्हरेस्ट व कांचनजुंगा शिखरवीर भूषण हर्षे, आनंद माळी, कृष्णा ढोकले, कांचनजुंगा शिखरवीर विवेक शिवदे, जितेंद्र गवारे, किरण साळस्तेकर व ओंकार हिंगे सहभागी होते. फडणवीस यांनी गिरीप्रेमींच्या जिद्दीचे व चिकाटीचे कौतुक केले व पुढील मोहिमांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.