चेन्नई – अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी हिंदू दहशतवादाविषयी भडकावू वक्तव्य करणाऱ्या कमल हासन यांची जीभ कापावी, असे मत तमिळनाडूचे मंत्री के. टी. राजेंद्र बालाजी यांनी व्यक्त केले आहे.
संपूर्ण समाजाला एका व्यक्तीसाठी दोष दिला जाऊ शकत नाही. कमल यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने कारवाई करावी. तसेच, त्यांच्या पक्षावर बंदी घालावी, अशी मागणी राजेंद्र बालाजी यांनी केली आहे.
दरम्यान, कमल यांनी हे विधान मुस्लीम लोकसंख्या जास्त असलेल्या मतदारसंघात करत असलो तरी, मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी ते करत नसल्याचे म्हटले होते. मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाचे कमल हे प्रमुख आहेत.
“स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता. तो म्हणजे महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे,’ असे वादग्रस्त वक्तव्य कमल हासन यांनी केले होते. तमिळनाडूतील अरीवाकुरीची लोकसभा मतदारसंघातील प्रचार रॅलीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना, कमल हासन यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.