अखिलेश यादव यांनी केली राज्यपालांकडे तक्रार
लखनौ – उत्तरप्रदेशात हत्यासत्र वाढले आहे. राज्याच्या बार कौन्सिल अध्यक्षांची त्यांच्या चेंबर मध्येच हत्या होते, कारागृहातही आता हत्या होऊ लागल्या आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा उडालेल्या बोजवाऱ्याचेच हे लक्षण असून राज्य सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे असे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी राज्यपाल राम नाईक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. उत्तरप्रदेशात जंगलराज निर्माण झाले आहे असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यपालांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणीही त्यांनी या निवेदनात केली आहे. समाजवादी पक्ष राज्यात सत्तेवर असताना राज्यपाल वेळोवेळी सरकारच्या कामात हस्तक्षेप करायचे आताही राज्यपालांनी हीच भूमिका घेऊन राज्य सरकारला जागे केले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. उत्तरप्रदेश बार कौन्सिलचे अध्यक्ष दरवेशसिंग यांची आग्रा कोर्टाच्या आवारात एका वकिलाने हत्या केल्याचा प्रकार कालच्या बुधवारी घडला आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यभर खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर अखिलेश यांनी राज्यपालांना हे निवेदन सादर केले आहे.