सातारा – खा. उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून आणि राज्य शासनाच्या सहकार्याने साताऱ्यात झालेल्या दोन दिवसांच्या महारोजगार मेळाव्यासाठी दहा हजार 298 जणांनी नोंदणी केली होती. यापैकी सहा हजार 249 जणांच्या मुलाखती विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी घेतल्या. यामधून सातारा, पुणे येथील कंपन्यांमध्ये एक हजार 419 जणांची निवड करण्यात येऊन त्यांना जागेवरच नियुक्तीपत्रे देण्यात आली. याशिवाय दोन हजार 200 जणांना विविध कंपन्यांनी प्रतीक्षायाद्यांमध्ये ठेवले आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार दोन हजार 630 युवकांना विविध कंपन्यांनी ट्रेनिंगसाठी निवडले आहे. या रोजगार मेळाव्यात अनेकांना नोकऱ्या मिळाल्याने, जिल्ह्यातील युवकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
साताऱ्याच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी उदयनराजेंच्या संकल्पनेतून “इनोव्हेटिव्ह सातारा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. याचा भाग म्हणून आठ दिवसांपूर्वी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत उद्योग परिषद झाली. त्यानंतर उदयनराजेंनी राज्य शासनाच्या सहकार्याने, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये दोन दिवसीय महारोजगार मेळावा घेतला. त्याला जिल्ह्यातील युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पालकांनीही या मेळाव्याबद्दल समाधान व्यक्त केले. अशा पद्धतीचे मेळावे वारंवार होणे गरजेचे असल्याचे मत अनेक पालकांनी व्यक्त केले.
भविष्याचा वेध घेत, करिअरच्या संधींची माहिती एकाच छताखाली मिळण्यासाठी “यूथ इन्फर्मेशन सेंटर’ गरजेचे आहे. या विचारातून उदयनराजेंनी शासनाकडे पाठपुरावा करून या सेंटरला मान्यता मिळवली आहे. या केंद्रासाठी सातारा शहरात जागेचा शोध सुरू आहे. हे केंद्र सुरू होईपर्यंत, कोणत्या कंपन्यांमध्ये किती जागा रिक्त आहेत आणि त्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, याची माहिती जिल्ह्यातील युवकांना मिळण्यासाठी, उदयनराजेंनी घोषणा केल्यानुसार युवक माहिती केंद्र जलमंदिर पॅलेस येथील कार्यालयात सुरू राहणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील युवकांनी घ्यावा, असे आवाहन संग्राम बर्गे यांनी केले आहे.
“एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ‘च्या धर्तीवर या “यूथ इन्फर्मेशन सेंटर’मध्ये युवकांना नोकऱ्यांसदर्भातील माहिती मिळणार आहे. याशिवाय करिअर गायडन्सची सेवादेखील दिली जाणार आहे. या सेंटरमध्ये युवकांचे समुपदेशन केले जाणार आहे. या केंद्रासाठी नगरविकास खात्याकडे यापूर्वीच एक कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळून, हा निधी सातारा पालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे. आता पालिकेकडून जागेचा शोध पूर्ण झाला की, लवकरच हे केंद्र तेथे सुरू करण्यात येणार असल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.