गणित आणि भौतिकशास्त्रचा पेपर यंदा कठीण
पुणे – देशातील आयआयटी, एनआयटी या संस्थेच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी जेईई ऍडव्हान्स सोमवारी देशभरात झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत गणित आणि भौतिकशास्त्रचा पेपर यंदा कठीण असल्याने “कटऑफ’ घसरण्याची शक्यता आहे.
यंदा देशभरातील 11 लाख 47 हजार विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स दिली होती. यामधून पात्र ठरलेल्या सुमारे 2 लाख 24 हजार विद्यार्थ्यांनी जेईई ऍडव्हान्स ही परीक्षा दिली. सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2 ते 5 या वेळेत परीक्षा घेण्यात आली. यंदा आयआयटी रुरकीतर्फे देशभरातील सुमारे 155 केंद्रांवर ही परीक्षा झाली. तसेच, गणिताचा पेपर, भौतिकशास्त्राचा पेपर अवघड गेल्याचे परीक्षार्थींनी सांगितले.
परीक्षेसंदर्भात आयआयटीन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक प्रा. दुर्गेश मंगेशकर म्हणाले, “या दोन प्रश्नपत्रिकांच्या तुलनेत रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका बरीच सोपी होती. प्रश्नपत्रिकेच्या पद्धतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. दोन्ही मिळून 372 गुणांची परीक्षा होती. एकूण 107 प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेच अवघड परीक्षा होती. त्यामुळे यंदा जेईई ऍडव्हान्सच्या “कटऑफ’मध्ये घट होण्याची शक्यता आहे.