नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. परंतु वृत्तवाहिन्यांनी केलेला सर्व्हे आणि हाती आलेल्या कल चाचणीवरून भाजपाला पूर्ण बहुमत मिळणे कठीण असल्याचे दिसत आहे. त्यातच आता भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या जनता दल युनायटेड(जेडीयू)चे वरिष्ठ नेते आणि आमदार गुलाम रसूल बलियावी यांनी नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची मागणी केली आहे.
मोदींना बहुमत न मिळाल्यास आणि मित्र पक्षांच्या मदतीने एनडीएचे सरकार आल्यास नितीश कुमार यांना पंतप्रधान करावे, असे गुलाम रसूल बलियावी म्हणाले आहेत. बिहारचे प्रमुख मुस्लीम नेते बलियावी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे विधान केले आहे.
राज्यात मोदींच्या चेहऱ्याने नव्हे, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या चेहऱ्याकडे पाहून काम करतोय. त्यामुळेच बिहारमधली जनता एनडीएला मतदान करत आहे. या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा, अशी मागणी गुलाम रसूल बलियावी यांनी केली.
बलियावी यांच्या मागणीवर भाजपकडून अद्याप कोणीही बोललेले नाही. मात्र या मागणीमुळे भाजपा व जदयूमध्ये पुन्हा दुरावा निर्माण होऊ शकतो, अशीही शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यामुळे नितीश कुमार हे भाजपाची साथ सोडत एनडीएमधून बाहेर पडले होते.