बंगळुरू – संयुक्त जनता दलाचे आमदार हे विश्वामित्राच्या मानसिकतेचे आहेत. ते प्रलोभनांच्या सुंदरीला कधीच भुलणार नाहीत. त्यामुळे एकही जण भाजपच्या गळाला लागणार नाही. आम्ही पुर्ण पाच वर्ष आघाडीचे सरकार यशस्वीपणे राबवू असे प्रतिपादन संयुक्त जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष ए. एच विश्वनाथ यांनी केले आहे. आज येथे ते पत्रकारांशी बोलत होंते.
कर्नाटकात आणि देशात भाजपला एकहाती यश मिळाल्यानंतर आता कर्नाटकातील जेडीएस-कॉंग्रेस आघाडीचे सरकार पडणार अशी वदंता आहे. भाजपने दोन्हीपक्षाच्या आमदारांना आपल्या गळाला लावण्याची व्युहरचना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विश्वनाथ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वरील उत्तर दिले.
दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की पक्षाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांचा तुमकुर मतदारसंघातून पराभव झाला असला तरी ते अजिबात व्यथित झालेले नाहीत कारण त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा चढउतार पाहिले आहेत. देवराज अर्स, इंदिरा गांधी अशा दिग्गज नेत्यांनाहीं पराभव पत्करावा लागला आहे. पण या नेत्यांचे दिमाखात राजकीय पुनरागमन झाल्याचेही आपण पाहिले आहे. त्यामुळे अशा एखाद दुसऱ्या पराभवाच्या घटनांनी खचून जाणारे आम्ही नाही असे त्यांनी नमूद केले.