हमीभावाअभावी कापडदरा येथील शेतकऱ्यांनी जड अंतःकरणाने घेतला निर्णय
वाल्हे – पुरंदर व बारामती तालुक्याच्या सीमेवरील राख (ता. पुरंदर) गावाजवळ कापडदरा या मध्यम लोकवस्ती असलेल्या गावातील शेतकरी विनायक पवार यांनी त्यांच्या शेतामधील आठ वर्ष जुनी असलेली डाळिंबाची बाग पाणीटंचाई व हमीभावाअभावी जेसीबीने जमीनदोस्त केली आहे.
दरम्यान, पारंपरिक पिके सोडून तरुण शेतकरी फळबाग लागवडीकडे वळू लागला आहे, त्यामुळे या परिसरात गेल्या तीन-चार वर्षांपासून डाळींब लागवडीच्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, यंदा दुष्काळाची दाहकता अधिक असून, त्याचा डाळींब बागांना फटका बसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी बागा तोडल्या आहेत. राखजवळील कापडदरा येथील विनायक पवार या तरुण शेतकऱ्याने आपल्या जेमतेम अर्धा एकरात पाण्याचे नियोजन करून आठ वर्षांपूर्वी कष्टाने डाळींब बाग उभी केली होती. मध्यंतरी बागेमध्ये बऱ्यापैकी उत्पादन मिळाले. मात्र, मागील तीन-चार वर्षांपासून पाऊस कमी झाल्याने विहीर आटली. बोअरवेल कोरडे, शेततळेही कोरडे पडल्याने बाग जगविणे अवघड झाले. परिणामी त्यांनी बाग तोडण्याचा निर्णय घेतला.
सरकारने दुष्काळ जाहीर केला. मात्र, उपाययोजना काही केल्या नाहीत. नोकरीच्या मागे न लागता ठिबक व फिल्टर संच, पाइपलाइनसाठी लाखो रुपये खर्च केला. रोपवाटिकेतील भगव्या जातीच्या डाळिंब रोपांची लागवड केली. पाऊस कमी झाल्याने पाणी कमी पडू लागले आणि डाळिंब बाग संकटात आल्याने ज्या हातांनी बागा लावली त्यांच हातांनी बाग तोडायला लागल्या.
– विनायक पवार, शेतकरी