मुझफ्फरनगर – पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने पश्चिम उत्तरप्रदेशातील रेल्वे स्थानके उडवण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे संबंधित रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शामली रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर यांचे नावे पाठवण्यात आलेले धमकीचे पत्र सोमवारी मिळाले. त्यानंतर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढवण्याबरोबरच प्रवाशांची कसून तपासणी करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. जैशने फेब्रुवारीत जम्मू-काश्मीरच्या पुलवामात भयंकर दहशतवादी हल्ला घडवला. त्या कृत्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला. सध्या उत्तरप्रदेशसह देशभरात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. अशातच रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याने ती घडामोड सुरक्षा यंत्रणांनी गांभीर्याने घेतली आहे.