म्युच्युअल फंडातील `डायरेक्ट’ गुंतवणुकीचा पर्याय `सही’ आहे का? (भाग-१)
‘म्युच्युअल फंड सही है’ असा केवळ प्रचार करून भागणार नाही. या गुंतवणूक पर्यायात असणाऱ्या विविध पातळीवरील जोखमींबाबतही संपूर्ण जबाबदारीने प्रचार करणे आवश्यक आहे. केवळ गुंतवणूकदाराने थेट गुंतवणूक करावी म्हणजे कमी खर्चात योजना घ्यावी असे सांगणे म्हणजे गाडी चालवता येत नसताना थेट महामार्गावर गाडी चालवण्यास सांगण्यासारखे आहे. याचा थेट परिणाम म्हणजे निश्चितच मोठा अपघात.
म्युच्युअल फंडाचे भारतात २५,००० पेक्षा जास्त अनुभवी व हुशार गुंतवणूकदार तज्ञ आज या विषयासाठी उपलब्ध आहेत. या गुंतवणूक सल्लागारांचा प्रत्येक गुंतवणूकादाराने अवश्य लाभ घ्यायला हवा. आपली गुंतवणूक योग्य अशाच योजनेमध्ये झाली पाहिजे व त्यातून अपेक्षित परतावा मिळावा यासाठीच नेमकी योग्य गुंतवणूक योजना कोणती याचे सार्थ मार्गदर्शन आपला गुंतवणूक सल्लागार करत असतो.
सध्या म्युच्युअल फंडांमध्ये अनेक मोठी स्थित्यंतरे होत आहेत. अनेक फंड मॅनेजर्स व गुंतवणूक तज्ञ एका म्युच्युअल फंड कंपनीतून राजीनामा देऊन दुसऱ्या कंपनीमध्ये रुजू होत आहेत. अनेक योजनांच्या मूळ संकल्पनेत मोठे बदल झाले आहेत, गुंतवणुकीचा पॅटर्न बदलत आहे. या सर्वांची थेट माहिती गुंतवणूकदारास नसते व तो याबाबत अनभिज्ञ असतो. केवळ काही ऑनलाईन वेबसाईटवर मागील पाच वर्षांचे व दहा वर्षांचे योजनेतील परतावे तपासून गुंतवणूकदार गुंतवणूक करताना दिसतात, त्यात भविष्यातील मागील काळात दिलेला परतावा परत तसाच मिळेल या अपेक्षेने केलेली गुंतवणूक भ्रमनिरास करणारी ठरू शकते. कारण मागील पाच ते दहा वर्षांत देशाची अर्थव्यवस्था, शेअर बाजार, म्युच्युअल फंडांच्या योजना, त्यांचे फंड मॅनेजर्स इत्यादी महत्त्वाच्या बाबी पूर्णतः बदललेल्या आहेत. त्यामुळे येणारी पाच ते दहा वर्षे मागील परिस्थितीपेक्षा वेगळी असणार आहेत.
नुकत्याच झालेल्या अनेक डेट म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये डायरेक्ट म्हणजेच थेट गुंतवणूकदारांना आयएल अँड एफएस व डीएचएफएल च्या डिफॉल्टच्या बातम्यांमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. म्यच्युअल फंडांच्या कंपन्या योजनेत झालेले नुकसान थेट गुंतवणूकदारास पाठवत आहेत. अशावेळी आपले आर्थिक सल्लागार असतील तर त्यातून गुंतवणूकदारांची सुटका काही प्रमाणात निश्चित होऊ शकते.
म्हणूनच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना थेट म्हणजेच `डायरेक्ट’ जर गुंतवणूकदारास आवश्यक गुंतवणूक ज्ञान नसेल तर मोठे नुकसान भविष्यात होऊ शकते. यामुळे आपल्या समोर येणाऱ्या जाहिरातींमधून प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःचे चिंतन करणे आवश्यक आहे.