हैदराबाद – इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या पर्वाचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील विजेता विजेतेपदासाठी मुंबई इंडियन्सला आव्हान देणार आहे. अद्याप दुसरा संघ ठरला नसला तरी या अंतिम सामन्याची जवळपास सर्व तिकिटे अवघ्या दोन मिनिटांत संपुष्टात आली आहेत. त्यामुळे चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि त्यांनी तिकीट विक्रीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी कोणतीही पूर्वकल्पना न देता अंतिम सामन्याच्या तिकिटांची ऑनलाईन विक्री सुरू केली. बीसीसीआयच्या या निर्णयाने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला, परंतु त्याहीपेक्षा ही तिकिटे अवघ्या दोन मिनिटांत संपल्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. हैदराबाद क्रिकेट संघाच्या कार्यकारी समितीच्या सदस्याने विचारले की, दोन मिनिटांमध्येच सर्व तिकीट कशी विकली जाऊ शकतात? ही अचंबित करणारी गोष्ट आहे.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानाची क्षमता ही 39 हजार इतकी आहे. त्यापैकी 25 ते 30 हजार तिकिटें विक्रीसाठी ठेवली जातात. मात्र, यावेळी किती तिकिटे विक्रीसाठी ठेवण्यात आली याची कल्पनाच कुणाला देण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1000, 1500, 2000, 2500, 5000, 12500, 15000 आणि 22500 अशी तिकिटांची किंमत आहे.
मात्र, ऑनलाइनवर फक्त 1500, 2000, 2500 आणि 5000 रुपये किंमत असलेली तिकिटे होती आणि तेही विकली गेली. 1500 व 2000 रुपयांची तिकिटे आता तिकीट खिडकीवर मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑनलाइन तिकीट विक्री करणाऱ्या कंपनीकडून सुधीर रेड्डी यांनी सांगितले की, मी कोणतीच माहिती देऊ शकत नाही. आम्हाला जेवढी तिकिटे विकण्यासाठी देण्यात आली ती आम्ही विकली.