मधुसूदन पतकी
दिवाळी नंतर जिल्ह्यातील राजकीय आखाड्यात शांतता आहे. आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा नाही. कोणावर टीका नाही.कोणाला कोणी आव्हान देत नाही किंवा कोणी कोणाचे आव्हान स्विकारत नाही . सध्या जे काही सुरु आहे ते मुंबई ,दिल्लीच्या आखाड्यात.प्रश्न असे आहेत की ज्यात आंदोलन करणारा राजकारणाचे जोडे बाजुला ठेवून चर्चेत सहभागी होतोय. यात ऊस दराचा प्रश्न असो किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा ; या मुद्यांवर राजकारणापलीकडे जाऊन विचार करण्याची समजूत सगळेच दाखवत असल्याने वेडेवाकडे काही घडावे असे दिसत नाही.
उस दराचा प्रश्न ही कोल्हापूर,सांगलीचा सुटताच साताऱ्यात ही तातडीने सुटला. हा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल आणि जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी नक्कीच विधायक प्रयत्न केले. त्याचे फळ म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था कायम राहून हा प्रश्न सुटण्यासाठी मार्गस्थ झाला.
मुंबई आणि दिल्लीत विधानसभा आणि लोकसभेच्या रणनितीसाठी आता इच्छूक नजर लावून बसले आहेत. आपल्या ताटात काय वाढले जाईल , सहा महिन्यांत परिस्थीती काय असेल, आपल्याला संधी कितपत मिळेल याची गोळीबंद रणनिती आखण्यात अनेक मंडळी गुंतली आहेत. आपले मित्र कोण आणि मित्रांमधले आपले विरोधक कोण याचा बारकाईने शोध ही घेणे सुरु आहे. काहींचे संपलेत.
ज्या ठिकाणी थेट लढती होणार त्या ठिकाणी मुख्यस्पर्धकांच्या जवळपासची मंडळी ,कार्यकर्ते हाताशी येतात का ते पहाण्याचा प्रयत्न सुरु आहेत.त्यात ही युती किंवा आघाडी होणार की नाही याची अद्याप कोणाला; कसलीच खात्री नसल्याने आपली ताकद वाढवणे हेच निवडणूक जिंकण्याचे प्रमूख साधन असेल. तशाही आत्ता पर्यंत झालेल्या निडणुका थ्री एम्वर लढवल्या जातात. यातील जो या “एम्’ पॉवर मध्ये सरस असेल त्याची निवडणुकीत सरशी होते.
जिल्ह्यात या निवडणुकीत वाई,माण-खटाव,दोन्ही कराड या मतदार संघात चुरस दिसणार आहे. होणारी निवडणूक आपले , पक्षाचे अस्तीत्व ठरवणारी असल्याने प्राणपणानी लढवली जाणार आहे. अर्थात निवडणूक किती ही मैत्रिपूर्ण लढत म्हणून म्हटली जात असली तरी त्यात हार-जित हा मुद्दा महत्वाचाच ठरत असतो. जिल्ह्यात सातरा, खटाव-माण मतदार संघात तर भाऊबंधकी दिसणार असल्याने या लढतींना विशेष महत्व आहे. अगदी नगर पंचायती पासून सोसायट्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण ,आपल्यामुळे पक्षाला कसे यश मिळाले हे डांगोरा पिटून सांगण्याचे हे दिवस आहे.
विधान सभेच्या अखेरच्या टप्प्यात ग्रामीण भागातील “”लगालगा मला बघा” ही म्हण स्पष्ट आचरणात आलेली दिसते. समर्थकांचे शक्ती प्रदर्शन, मेळावे,वाढदिवस आणि बरेच काही आयोजित करून वादळापूर्वीच्या शांततेला गती देण्याचा प्रयत्न केला जातोय. पक्षाचे भगिरथ,चाणक्य, थिंक टॅंक मतदार याद्यांसह ,सोशक मिडीयावर लक्ष केंद्रीत करत आहेत. वादळापूर्वीची ही शांतता हळू हळू गदारोळात बदलेल. गारठा वाढेल तसतसा राजकीय उष्णतेचा पारा वाढेल. आर्थात एक दिवसाच्या मतदार राजाने या शांततेचा विचार करून मत द्यायचे आहे. शांतता सकारात्मक ठेवायची आहे, विधायक,रचनात्मक ठेवयाची आहे याचीच कृतीशील दखल घ्यायची करायची आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा