पृथ्वी, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू व आकाश यांना पंचमहाभूतं म्हटलं जातं. परंतु, एक आर्थिक सल्लागार म्हणून मी, टर्म इन्शुरन्स म्हणजेच निव्वळ आयुर्विमा, आरोग्य विमा अर्थातच हेल्थ इन्शुरन्स, वैयक्तिक अपघात विमा म्हणजे पर्सनल ऍक्सीडंट इन्शुरन्स, गाडीचा विमा (कार इन्शुरन्स) व घर विमा या पाच गोष्टींना पंचमहाभूतं असं संबोधतो. याचं कारण म्हणजे या गोष्टींवर जर आपण प्रभुत्व मिळवलं तर आपण खूपसे चिंतामुक्त होऊ शकतो. कारण हीच आपल्या आयुष्यातली शब्दशः अशी पंचमहाभुतं आहेत ज्यांच्या बाबतीत आपण नेहमी भय बाळगून असतो किंवा या बाबतीत सदानकदा आपल्यावर टांगती तलवार असते.
अचानक घरातील कमावत्या व्यक्तीचा अंत झाल्यास घरात येणारं उत्पन्न बंद होतं. अशावेळी त्या कमावत्या व्यक्तीच्या पश्चात त्याच्यावर (त्याच्या मासिक उत्पन्नावर देखील) निर्भर असलेल्या कुटुंबीयांना त्या गमावलेल्या उत्पन्नाइतकंच उत्पन्न घरात यावं ही भाबडी आशा असते, जी व्यवहार्य आहे. परंतु त्यासाठी कुटुंब प्रमुखानं जागरूक असणं गरजेचं आहे. साधारणपणे एका कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाच्या कमीतकमी 13 पट इतक्या रकमेचा निव्वळ आयुर्विमा असणं आजच्या अनिश्चिततेच्या जीवनात अपरिहार्य आहे जेणेकरून ती रक्कम जर स्थिर उत्पन्न अथवा मुदत ठेवेसारख्या योजनेत गुंतवली तर येणारं मासिक व्याज हे साधारणपणे त्या गमावलेल्या उत्पन्नाइतकं असावं हा त्यामागचा हेतु.उदा. एखाद्या व्यक्तीचं मासिक उत्पन्न जर 30,000 रुपये असेल तर गुणिले बारा म्हणजे 3,60,000 रुपये झालं त्याचं वार्षिक उत्पन्न, या वार्षिक उत्पन्नाच्या साधारणपणे 13 पट म्हणजे झाले 46,80,000 रुपये. आता हेच 46,80,000 रुपये 7.5 टक्के दरानं जोखीम-वजा योजनेत गुंतवल्यास वार्षिक व्याज मिळू शकतं, 3,51,000 रुपये, त्यास भागिले 12 केल्यास साधारणपणे 29,250 रुपये म्हणजे साधारण गमावलेल्या कमावत्या व्यक्तीच्या मासिक उत्पन्नाच्या जवळपास जाणारं उत्पन्न मिळू शकतं. याला खऱ्या अर्थानं म्हणता येईल, जिंदगी के बाद भी ! त्यामुळं अशाच प्रकारचा आयुर्विमा असणं गरजेचं ठरतंय.
विमा, हेल्थकेअर आणि औषधे; पोर्टफोलियोला द्या बूस्टर डोस (भाग-२)
विमा, हेल्थकेअर आणि औषधे; पोर्टफोलियोला द्या बूस्टर डोस (भाग-३)
तशीच दुसरी बाब म्हणजे आरोग्य विमा. आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणत्याही कुटुंबास या प्रकारचं संरक्षण असणं गरजेचं आहे, कारण आहे हॉस्पिटलायझेशनचं टेन्शन. आज कोणत्याही लहान मोठ्या आजारासाठी किंवा अगदी तपासणीसाठी सुद्धा अद्ययावत इस्पितळात दाखल केल्यास अव्वाच्या सव्वा बिल पाहण्याची सवयच झालीय व त्याचीच धास्ती वाटू लागलीय. घरात आजार म्हटला की, माणूस प्रथम विचार त्या रुग्णास काय झालं आहे याचा न करता कोणत्या हॉस्पिटलमध्ये भरती केल्यास जास्त बिल येईल अथवा येणार नाही याबद्दल करताना दिसतो. याचं कारण म्हणजे पुरेसा आरोग्यविमा नसणं. घरातील प्रत्येक व्यक्तीचा आरोग्यविमा असणं ही आज काळाची गरज बनत चाललीय कारण आरोग्य विमा नसल्यानं कुटुंबातील कोणाही एका व्यक्तीच्या हॉस्पिटलायझेशन नंतर तुमची संपूर्ण बचत कदाचित कारणी लागू शकते. हे टाळण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचा कमीत कमी 10 – 15 लाखांचा विमा असणं गरजेचं आहे. बऱ्याच नोकरदार लोकांना त्यांच्या नियुक्त कंपन्या हा विमा पुरवत असतात.