मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा धडक मोर्चा वांद्रे येथील बी.के.सी. मैदान येथे धडकला. या वेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेनेचे नेते, मंत्री, खासदार, आमदार आणि शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले आमच्यावर टीका करणार्यांनी आधी स्वतःच्या रक्तातील भेसळ बघावी. सरकार कोणाचंही असो, माणुसकी महत्वाची असते आणि माणुसकी जपणारी आम्ही लोकं आहोत. जो शेतकरी आपलं रक्त आटवून आपल्यासाठी अन्न पिकवत असेल, आपली काळजी घेतो. त्याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. मुंबईसाठी ज्या शेतकऱ्यांनी रक्त सांडलं आहे त्यांच्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत.
मोठ मोठी लोक चुना लावून देश सोडून गेले, माझा शेतकरी देह सोडून जातो. मी सर्व बँकांना, विमा कंपन्यांना १५ दिवसांची मुदत देतोय, १५ दिवसात सर्व कर्जमुक्ती झालेल्या शेतकर्यांना पैसे मिळालेचं पाहिजेत. मी विमा कंपन्यांना विनंती करतो, आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका, असे उद्धव ठाकरे म्हणाले.