पुणे – सेनापती बापट रस्त्यावर झालेल्या भूमीगत वीजवाहिन्याच्या स्फोटाची महावितरण प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. यापुढील कालावधीत अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी शहरातील सर्व भूमिगत वीजवाहिन्यांची तपासणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी खास तज्ज्ञ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचा अहवाल संबधित परिमंडल आणि मुख्य कार्यालयाला देणे बंधनकारक करण्यात येणार आहे, त्यानंतर संबधित ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
शहरातील वीजवाहिन्यांचे जाळे कमी करण्यासाठी आणि त्यामाध्यमातून होणारे अपघात टाळण्यासाठी महावितरण प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करुन शहर आणि उपनगरांमधील वीजवाहिन्या भूमीगत करण्यात येत आहेत, त्याचा ठेका खासगी ठेकेदारांना देण्यात आला आहे. त्यानुसार या वीजवाहिन्या भूमीगत करण्यासाठी काही निकष ठरवून देण्यात आले आहेत, विशेष म्हणजे त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार या वाहिन्या टाकण्यासाठी खड्डे किती खोल असावेत याचे नियम ठरवून देण्यात आले आहेत. मात्र, बहुतांशी ठेकेदार मजुरी वाचविण्यासाठी हे निकष पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या आठवड्यात सेनापती बापट रस्त्यावर झालेल्या अपघाताने ही बाब उघडकीस आली आहे.