माधव श्रीकांत किल्लेदार
इस्त्रायली लोकांमध्ये डेव्हिड राजाचे खूप महत्त्व आहे. डेव्हिडच्या पराक्रमामुळे ज्यूंना त्यांचे गतवैभव परत मिळाले होते. ज्या इजिप्तमध्ये वर्षानुवर्षे ज्यू पारतंत्र्याचे जीवन जगत होते. त्याच इजिप्तमध्ये डेव्हिडच्या कार्यकाळात एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं होतं. डेव्हिडचं खासगी जीवन हे खूप विलासी होतं. तो स्वतः भावगीते रचायचा आणि अनेक वाद्यांची त्याला उत्तम जाण होती. त्याला 6-7 राण्या होत्या. वयाच्या उत्तरार्धात स्वतःचा संसार सांभाळण्यात तो प्रचंड व्यस्त झाला. त्याचा वृद्धापकाळ हा खूप खडतर आणि गृहकलहांनी भरलेला होता. त्या गृहकलहांना तोंड देण्यातच त्याचा वृद्धापकाळ गेला. हे सर्व दुःख सोसत असतानाच त्याने आपला पुत्र सॉलोमन याला राजा बनवले. सॉलोमन हा डेव्हिड एवढा पराक्रमी निश्चित नव्हता, पण विलासी आणि रसिक वृत्तीत डेव्हिडपेक्षा दोन पावलं पुढे होता.
डेव्हिडची आवडती राणी बाथशिबाचा पुत्र सॉलोमन हा इतर राजांच्या तुलनेत भव्यदिव्य आणि सर्वोत्तम होता. त्याने राज्यविस्ताराकरीता 30 राण्या केल्या आणि त्यांच्या जनानखान्यात 300 दासी होत्या. 12,000 घोडदळ आणि 1400 रथ यांनी सुसज्ज असलेलं त्याचं सैन्य शत्रूच्या मनात धडकी भरवत असे. दूरवरच्या देशांशी व्यापारी संबंध निर्माण करण्याकरिता त्याने एलाथ आणि एझिआन गेबर या सिंधुसागरातील बंदरात मोठमोठ्या व्यापारी नौका बांधण्यास सुरुवात केली. त्याच कालावधीत आपल्या हिंदुस्थानात अकाबा या समुद्रधुनीतून काही जहाज येत. भूदलासही नौदल आणि आरमाराची स्थापना ही सॉलोमनच्या काळात केली गेली. ज्यू जीवन हे त्याकाळात समृद्ध होतं. तरच वैभवाच्या परमशिखरावर होते. सॉलोमनने भव्य राजप्रासाद निर्माण केले. त्यात देशोदेशींचे पशू-पक्षी आणून प्राणिसंग्रहालये थाटली. आपल्या भारत देशातून त्यात मोर आणि माकडं नेली गेली होती. सॉलोमनचे मांडलिक राजे त्याला खंडणी देत असत. जेव्हा खंडणी अपुरी पडू लागली त्यावेळी प्रजेवर क्रमाक्रमाने कराचाभार वाढवावा लागला.
इस्त्रायलच्या वाढत्या व्यापारामुळे ज्यूंचे वैभव वाढले. त्यांनी बनवलेल्या मातीच्या आणि लाकडी भांड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. ईस्त्रायली लोकांची मातीची घरं जाऊन दगडी वाडे बनू लागले. मलमलीचे झुळझुळीत वेशभूषा इस्त्रायली लोक करू लागले. स्थानिक गाढवांऐवजी आयात केलेले घोडे नागरिक वापरू लागले. हस्तिदंत, सोने, हिरे-माणिके या वसंतूंनी बाजारात झगमगाट निर्माण झाला. परंतु, प्रत्येक राजाचा, राज्याचा आणि राजकीय जीवनाचा जसा उत्कर्ष किंवा उदय असतो तसाच अस्तही असतो. त्याप्रमाणे सॉलोमनमध्ये डेव्हिडसारखी युसुत्सु वृत्ती नसल्याने सिरिया आणि इडोम या भागात शत्रूने बंडाचे निशाण उभारले. परंतु, डेव्हिडच्या पूर्वपुण्यईमुळे जेरुसलेमवर आलेला हल्ला परतवला गेला.
याच कालावधीत डेव्हिड हा मृत्युपंथास लागला होता. त्याच्या राज्यात बंडाळी माजली होती. त्याची मुले आणि सरदार राज्य मिळावं म्हणून कटकारस्थानं करू लागली. कारण, सॉलोमनच्या विलासी आणि एकतंत्री तसेच स्वच्छंदी कारभारामुळे प्रजेमध्ये शिथिलता निर्माण झाली आणि एका सार्वभौम राज्याला उतरती कळा लागली. “सूर्याच्या पोटी शनि।” अशा प्रकारचीच काही कारकीर्द ही सॉलोमनची राहिली. पण त्यामुळे डेव्हिडचं महत्त्व कधीही कमी होत नाही. ज्यू जीवनाचा पराक्रमी, परमवैभवी आणि प्रखर राष्ट्रीयत्वाचा पाया हा डेव्हिडनेच तयार केला. एका ईश्वरदुतापेक्षा डेव्हिचं महत्त्व हे ज्यू जीवनात निश्चितच कमी नाही. म्हणूनच डेव्हिडविषयी राग शंकरात म्हणावेसे वाटते.
डमडमत डमरू ये, खणखणत शूल ये,
शंख फुंकीत ये, येई रुद्रा।
पूवी नरसिंह तू प्रगटुनी फाडिले
दुष्ट जमिं अन्य गृहिं दरवडे पाडिेल।।
कडकडा फोड नभ, उडत उडुमक्षिका, खडबडवि दिग्गजा. तुडव रविमालिका।।”
(क्रमशः)