गुंतवणूक वाढीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला भारताला सल्ला
वॉशिंग्टन – सरकार उद्योग करणे सोपे व्हावे याकरिता अनेक पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. त्यात काही प्रमाणात यशही मिळू लागले आहे. ज्या देशात उद्योग करणे सोपे असते त्या देशात थेट परकीय गुंतवणूक वाढते आणि चालू खात्यावरील तूट कमी होण्यास मदत होते, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.
ज्या देशातील उद्योगाचे नियम गुंतागुंतीचे असतील व परवाने घेण्यासाठी वेळ लागत असेल तर परदेशी गुंतवणूकदार अशा देशाकडे दुर्लक्ष करीत असतात. भारताने या क्षेत्रात बरीच प्रगती केली असल्यामुळे गेल्या काही वर्षापासून भारतातील थेट परकीय गुंतवणूक वाढू लागली आहे. मात्र तरीही आयात-निर्यात शुल्क पातळीवर भारताला बरेच काम करावे लागणार आहे. आयात निर्यात शुल्क वेळोवेळी कमी जास्त केल्यानंतर निर्यातदारांना व आयातदारांना निर्णय घेणे अवघड होऊन जाते. आयात आणि निर्यात वाढल्याशिवाय त्या देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीची होत नाही. त्याचबरोबर आवश्यक तितके परकीय चलन मिळत नाही. त्यामुळे या क्षेत्रात भारताने बऱ्याच सुधारणा करण्याची गरज असल्याचे नाणेनिधीच्या अहवालात म्हटले आहे.
कर क्षेत्रातील गुंतागुंत जीएसटीमुळे कमी झाली आहे. मात्र हा कायदा आणखी पुरेसा रुळलेला नाही. त्याचबरोबर करांची संख्या कमी करण्याची गरज आहे. भारताची चालू खात्यावरील तुट सध्या वाढून 2.5 टक्क्यावर गेली आहे. गेल्या वर्षी ही तूट 1.08 टक्के एवढी होती