नवी दिल्ली – भारतात केवळ अन्नप्रक्रियाच नाहीतर अन्नपुरवठा आणि हॉटेल उद्योग वेगाने वाढणार आहे. तसेच या क्षेत्राचे विकासदरातील योगदान वाढणार असल्याचे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले. भारतात सध्या सेवाक्षेत्रात हॉटेल उद्योगाचा क्रमांक तिसरा लागतो.
पहिल्या क्रमांकावर किरकोळ विक्री तर दुसऱ्या क्रमांकावर विमा व्यवसाय आहे. भारताचा सध्याचा विकासदर साडेसात टक्के आहे तो जर नऊ ते दहा टक्के करायचा असेल तर हॉटेल उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
भारतातील हॉटेलचालकांची संघटना असलेल्या एनआरएआयच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, भारतात आगामी काळात अन्नप्रक्रिया क्षेत्राबरोबरच अन्नपुरवठा क्षेत्रात क्रांती होणार आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ लागली आहे. तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्यामुळे हे क्षेत्र अधिक वेगाने विकसित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.