लंडन – फलंदाजांच्या धमाकेदार कामगिरीनंतर भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव करत विश्वचषक स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 5 बाद 352 धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळताना ऑस्ट्रेलियाला निर्धारित 50 षटकांत सर्वबाद 316 धावाच करता आल्याने भारताने हा सामना 36 धावांनी आपल्या नावे केला. 353 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने सावध सुरुवात केली. सलामीवीर ऍरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियाला 61 धावांची सलामी दिली. यावेळी चोरटी धाव घेण्याच्या नादात फिंच धावबाद झाल्याने ही जोडी फुटली.
फिंच बाद झाल्यानंतर आलेल्या स्टिव्ह स्मिथच्या साथीत डेव्हिड वॉर्नरने संघाचा डाव सावरायला सुरुवात केली. यावेळी दोघांनीही 20 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाला शंभरी गाठून दिली. मात्र, यानंतर अर्धशतकी खेळी करणारा वॉर्नर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. वॉर्नर बाद झाल्यानंतर आलेला ख्वाजा आणि स्मिथ यांनी सावध खेळी करत एकेरी आणि दुहेरी धावा करत संघाला 200 धावांचा टप्पा गाठून दिला.
मात्र, ख्वाजा 42 धावा करून परतल्यावर आलेल्या मॅक्सवेलने फटकेबाजी करत संघाची खालावलेली धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चहलने मॅक्सवेल (28) आणि भुवनेश्वरने स्मिथ (69) आणि स्टोइनिसला (0) बाद करत ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले. यानंतर अखेरच्या फळीत आलेल्या ऍलेक्स केरीने फटकेबाजी करत नाबाद 55 धावांची खेळी साकारली. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने आवश्यक साथ न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
तत्पूर्वी, फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने सावध खेळ करायला सुरुवात केली. त्यामुळे भारताने 12व्या षटकांत अर्धशतकी मजल ओलांडली. तर, 19 व्या षटकांत भारताने शतकी मजल मारली. यावेळी धवन आणि रोहितने आपापली अर्धशतक पूर्ण करत फटकेबाजी करायला सुरुवात केली. मात्र, 57 धावा करून रोहित परतल्याने 127 धावांवर भारताला पहिला धक्का बसला.
रोहित बाद झाल्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीच्या साथीत शिखर धवनने भारतीय संघाचा डाव सावरायला सुरुवात केली. दोघांनीही चेंडूस धाव या सरासरीने भारताचा धावफलक हालता ठेवण्याचे काम करत 26.4 षटकांत भारताचे दीडशतक फलकावर लावले. यावेळी विराट सावध तर शिखर फटकेबाजी करत संघाचा डाव सावरत होता. त्यातच शिखरने 95 चेंडूत आपले शतक झळकावले.
मात्र, फटकेबाजी करण्याच्या नादात धवन 109 चेंडूत 16 चौकारांच्या मदतीने 117 धावा करून परतल्याने भारताला 220 धावांवर दुसरा धक्का बसला. यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजी करायला सुरुवात करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर दबाव वाढवायला सुरुवात केली. हार्दिकने विराटच्या साथीत 9 षटकांमध्ये 81 धावांची वेगवान भागीदारी नोंदवत भारताला 301 धावांची मजल मारून दिली.
मात्र, यावेळी हार्दिक 27 चेंडूत 48 धावा करून परतला. दरम्यान दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणाऱ्या विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. हार्दिक परतल्यावर आलेल्या धोनी आणि विराटने फटकेबाजी करायला सुरुवात केली. मात्र, अखेरच्या षटकांत 27 धावांवर धोनी तर 82 धावांवर असताना विराट बाद झाल्यानंतर लोकेश राहुलने भारताला 352 धावांची मजल मारून दिली.
संक्षिप्त धावफलक :
भारत 50 षटकांत 5 बाद 352 (धवन 117, कोहली 82, स्टोइनिस 2-62) वि.वि. ऑस्ट्रेलिया 50 षटकांत सर्वबाद 316 (स्मिथ 69, वॉर्नर 56, केरी नाबाद 55, भुवनेश्वर 3-50, बुमराह 3-61)