लंडन – पारंपारीक प्रतिस्पर्धी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान 16 जुन रोजी विश्वचषक स्पर्धेत सामना होणार असून या सामन्याची संपुर्ण तिकिट केवळ 48 तासात संपुष्टात आली असल्याची माहिती विश्वचषक नियोजन समितीकडून देण्यात आली आहे.
इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जूनला ओल्ड ट्रॅफर्ड या मैदानावर सामना होणार आहे. या सामन्याबद्दल दोन्ही देशांमधील चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कारण भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये अखेरचा सामना आशिया चषक स्पर्धेत झाला होता. ज्यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाचा सहज पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर विश्वचषकात पुन्हा एकदा हे दोन्ही संघ समोरासमोर येणार असल्याने सामन्याची उत्सूकता ताणली गेली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांना प्रचंड मागणी असून, यासाठी आयोजकांना सतत फोन येत आहेत आणि यातील जास्तीतजास्त फोन भारतातून येत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. याच मैदानावर 26 जूनला भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना होणार आहे. परंतु, त्यासाठी इतकी उत्सुकता कोणी दाखवलेली नाही. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सहाही सामन्यांत भारताने बाजी मारलेली आहे.