वॉर्सेस्टर – भारताच्या 19 वर्षाखालील संघाने तीन देशांच्या क्रिकेट स्पर्धेत विजयी सुरूवात केली. त्यांनी इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. कार्तिक त्यागी व रवी बिश्नोई यांची भेदक गोलंदाजी आणि यशस्वी जैस्वाल याची शैलीदार फलंदाजी हे भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 46.3 षटकांत 204 धावांमध्ये कोसळला. भारताने हे लक्ष्य 39.2 षटकांत व पाच गड्यांच्या मोबदल्यात पार केले. या दोन संघांबरोबर बांगलादेशचा संघही या स्पर्धेत खेळत आहे.
भारताच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करीत इंग्लंडच्या फलंदाजांची त्रेधातिरपीठच उडविली. भारताकडून त्यागी (3-35), बिश्नोई (3-40), सुशांत मिश्रा (2-39) व विद्याधर पाटील (2-46) यांनी गोलंदाजीत चांगले यश मिळविले. इंग्लंडच्या लेविस गोल्डसवर्थी याने सर्वाधिक 58 धावा केल्या. टॉम क्लार्क (29) व जॅक हेनीस (26) यांचे प्रयत्न संधास 200 धावांपर्यंत नेण्यासाठी उपयुक्त ठरले. मात्र त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी निराशा केली.
भारताला 205 धावा करताना झगडावे लागले. 205 धावा करताना त्यांना पाच गडी गमवावे लागले. जैस्वालने 9 चौकारांसह 78 धावा केल्या. त्याने दिव्येश सक्सेना याच्या साथीत 92 धावांची भागीदारी केली. सक्सेनाने दमदार खेळ करीत 43 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक :
इंग्लंडचा डाव 46.3 षटकांत 204 (लेविस गोल्डसवर्थी 58, टॉम क्लार्क 29, जॅक हेनीस 26, कार्तिक त्यागी 3-35, बिश्नोई 3-40, सुशांत मिश्रा 2-39, विद्याधर पाटील 2-46) भारत 39.2 षटकांत 5 बाद 205 (यशस्वी जैस्वाल 78, दिव्येश सक्सेना 43, प्रियम गर्ग 38)