– रोहन मुजूमदार
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यासह जिल्ह्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. तर निवडणूक आयोग, त्या-त्या ठिकाणीचे शासकीय अधिकारी, दिग्गजांसह मराठी कलावंत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध योजना राबवत आहेत. यात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असले तरी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सगळ्यांचाच कस लागणार आहे. तर ही मोहीम यशस्वी होणार की नाही हे मतदानानंतर जाहीर होणाऱ्या टक्केवारीनंतर स्पष्ट होईल.
भारतीय लोकशाही बळकट होण्यासाठी, लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काय करता येईल, या विचारातून विविध मोहीम राबवल्या जात आहेत. सध्या तरुण मतदारांपासून ज्येष्ठांपर्यंत बहुतेक सर्वजण समाजमाध्यमांचा वापर करतात. त्यात ग्रामीण किंवा शहरी असा भेद नाही. त्यामुळे मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी डिजिटल मोहीम राबवली जात आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मराठी कलावंतांनी पुढे सरसावत डिजिटल चळवळ सुरू केली आहे. समाजमाध्यमांद्वारे कलाकार “आयव्होट’ मोहीम राबवणार असून, मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी कलाकारांकडून आवाहन करण्यात येणार आहे. “आयव्होट’ ही मोहीम संवादी पद्धतीने राबवली जाणार आहे. त्यामध्ये मतदानाविषयीची रंजक माहितीही दिली जाईल. अराजकीय अशी ही मोहीम असून केवळ मतदानासाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. तसेच ही मोहीम व्यापक होण्यासाठी समाजमाध्यमांतील अन्य व्यासपीठांचीही मदत घेतली जाणार असल्याचे कलावंतांचे म्हणणे आहे.तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या विचारातून ही मोहीम राबवण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी मतदार जनजागृती अभियान सुरू आहे. यात “स्वीप’ अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्यात आले असून त्यांच्याद्वारे पालकांमध्ये जनजागृती केली जात आहे. तसेच चित्रवाहन, सांस्कृतीक कार्यक्रम, नाटीका, संगीत अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती सुरू असून 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान व्हावे
विरोधकांसह दिग्गजांना मोदींचे आवाहन
मतदानासाठी न येणे हे लोकांना कमीपणाचे वाटले पाहिजे. देशामध्ये तुमच्या मनाजोगे काही झाले नाही, तर तुम्हाला विचार करणे भाग पडेल, की मतदानाच्या दिवशी मी गेलो नाही म्हणून ही दुर्दैवी परिस्थिती ओढवली; तुम्हाला अशी परिस्थिती हवी आहे का?, असे ट्विट मध्यंतरी नरेंद्र मोदी यांनी करून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विरोधक, खेळाडू, चित्रपट सृष्टीतील अभिनेते, अभिनेत्रींसह दिग्गजांना आवाहन केले आहे.