नवी दिल्ली – भारताकडे गरजेपेक्षा जास्त साखर आहे. त्यामुळे ही साखर जास्तीत जास्त प्रमाणात निर्यात करून भारतातील साखरेचा साठा कमी करण्यावर साखर कारखाने आणि सरकार भर देत आहे. त्यामुळे देशातील ऊस उत्पादकांना किफायतशीर भाव देण्यात मदत मिळू शकेल. या साखर वर्षाच्या आतापर्यंतच्या काळात भारताने 21.29 लाख टन साखरेची निर्यात केली आहे.
यात कच्च्या साखरेचे प्रमाण 9.76 लाख टन आहे. अखिल भारतीय साखर व्यापारी संघटना म्हणजे आयएएसटीएने जाहीर केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर 7.4 लाख टन साखर निर्यात करण्याचे व्यवहार अंतिम टप्प्यात आहेत, असे आयएएसटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. भागरिया यांनी सांगितले.
आतापर्यंत प्रत्यक्षात आणि तत्वतः तीस लाख टन साखर निर्यात करण्याचे व्यवहार झालेले आहेत. गेल्या वर्षी भारताने केवळ पाच लाख टन साखरेची निर्यात केली होती. भारताने ज्या देशांना साखरेची निर्यात केली आहे त्यात बांगलादेश, श्रीलंका, सोमालिया, अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. केंद्र सरकारने साखर कारखान्यांना ऑक्टोबर ते सप्टेंबर या काळात 50 लाख टन साखर निर्यात करण्याची सूचना दिली आहे.